लोकलच्या आपुऱ्या फेऱ्यांमुळे वसईकरांचा जीव धोक्यात, वर्षभरात 61 प्रवाशांचा घेतला गर्दीने बळी

पश्चिम रेल्वे मार्गावर वसई आणि विरारपर्यंत लोकलच्या फेऱ्या अपुऱ्या आहेत. त्यामुळे प्रत्येक लोकलमध्ये मोठी गर्दी होत असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वर्षभरात वैतरणा ते मीरा रोड या स्थानकांदरम्यान 284 प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी 61 प्रवासी हे गर्दीचा बळी ठरले. गर्दीमुळे प्रवासी दरवाजात लटकलेले असताना ते निसटून खाली पडले आणि त्यातच त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

विरार, नालासोपारा, वसई, नायगाव ते मुंबई असा दरोरज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे 15 लाख आहे. यातील बहुतांश प्रवासी नालासोपारा रेल्वे स्थानकांतून प्रवास करतात. परंतु वाढती प्रवासी संख्या प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. लोकलमध्ये उभे राहण्यासाठी जागा मिळत नसल्याने अनेक प्रवाशांना दरवाजात उभे राहून प्रवास करण्याशिवाय पर्याय उरत नाही. वाढत्या गर्दीमुळे या प्रवाशांना रेल्वेतून लटकून प्रवास करण्याशिवाय पर्याय राहत नाही. दिवसेंदिवस लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत चालल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. पश्चिम रेल्वेचा हा प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे.

लोकलच्या फेऱ्या वाढवा
लोकलच्या फेऱ्या अपुऱ्या असल्याने वसई आणि विरारकरांचा प्रवास गर्दीतून होत आहे. त्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे वाढते अपघात कमी करण्यासाठी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात, प्रवाशांचे हित आणि सुरक्षा नरजेसमोर ठेवून आवश्यक ते निर्णय तातडीने घेण्यात यावेत, अशी मागणी उपजिल्हाप्रमुख किशोर पाटील यांनी केली. मागण्यांचे निवेदन त्यांनी पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाबरोबर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनाही पाठवले आहे.