महाराष्ट्राचा पदकचौकार, ट्रायथलॉनमध्ये दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई

गतविजेत्या महाराष्ट्राने 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी ट्रायथलॉन स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशी चार पदकांची कमाईक करीत धडाकेबाज सुरूवात केली. महिला ट्रायथलॉनमध्ये डॉली पाटील हिने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले, तर मानसी मोहिते हिने रौप्य पदकाची कमाई केली. ट्रायथलॉनच्या मिश्र रिले शर्यतीतही महाराष्ट्राने सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरूषांच्या ट्रायथलॉनमध्ये पार्थ निरगे याने कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राच्या झोळीत पहिले पदक टाकले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
महिला गटात दुसऱ्यांदा सोनेरी यश ट्रायथलॉनच्या महिला एकेरीत महाराष्ट्राला सलग दुसर्या वर्षी सुवर्णपदक मिळाले. डॉली पाटील हिने एकूण 1 तास 10 मिनिटे व 03 सेपंद वेळेसह हे सोनेरी यश संपादन केले. तिचीच राज्य सहकारी मानसी मोहिते हिने रौप्यपदकाची कमाई केली. दोघीही पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडू होत. मध्य प्रदेशच्या आद्या सिंहला कांस्यपदक मिळाले. त्यानंतर महाराष्ट्राला मिश्र रिले शर्यतीतही सुवर्णपदक मिळाले. दिवसभरातील महाराष्ट्राचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले. प्रशिक्षक बालाजी पेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ही पदकांची लयलूट केली.

15 वर्षांनंतर पदक
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उद्या (दि.28) होणार असले, तरी 26 जानेवारीलाच ट्रायथलॉन (750 मीटर जलतरण, 20 किलो मीटर सायकलिंग, 5 किलो मीटर धावणे) क्रीडा प्रकाराने या स्पर्धेचा शंखनाद झाला आहे. हल्दवानी शहरातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पुरूषांच्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूरचा दबदबा बघायला मिळाला. सरोंगबम अथौबा मैतेई याने सुवर्णपदक जिंकले, तर त्याचाच राज्यसहकारी तेलहाईबा सोराम रौप्यपदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राच्या पार्थ निरगेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, त्याने तब्बल 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या स्पर्धेत महाराष्ट्राला पदक जिंकून दिल़े

आपले क्रीडापटू पुन्हा विजेतेपद खेचून आणतील – अजित पवार
डेहराडून येथे होणाऱया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पथकप्रमुख संजय शेटे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. महाराष्ट्राचे खेळाडू गत स्पर्धेप्रमाणेच विजेतेपद खेचून आणतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघाला शुभेच्छा देताना व्यक्त केला.