सूर्यनारायणाच्या कोपातून सुटका होणार; ठाण्यातील शाळांची रोज सकाळीच घंटा वाजणार

तापमानाने चाळिशी गाठण्यास सुरुवात केली असून सर्वांच्याच अंगाची अक्षरशः लाहीलाही होऊ लागली आहे. सूर्यनारायणाच्या या तडाख्यातून विद्याथ्यर्थ्यांची सुटका करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने आपल्या शाळांचे वेळापत्रक बदलले आहे. त्यानुसार 15 मार्चपासून सकाळी 9 ते दुपारी 2 तर 1 एप्रिलपासून सकाळी 9 ते दुपारी 1. 15 यादरम्यान ग्रामीण भागातील शाळांची घंटा वाजणार आहे. त्यामुळे पायवाटा तुडवत रखरखत्या उन्हात शाळा गाठणाऱ्या हजारो मुलांची उष्णतेच्या लाटेतून ‘सुट्टी’ होणार आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या पूर्वी प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार ठाणे जिल्हा परिषद शाळांची वेळ 15 मार्चपासून सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तर 1 एप्रिलपासून सकाळी 9 ते दुपारी 1.15 अशी शनिवारच्या शाळेच्या वेळेप्रमाणे निर्धारित करण्यात आली होती.

■ एप्रिल, मेमध्ये जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता अधिक असते. तसेच हवेतील आर्द्रतेमुळे उकाड्याचे प्रमाणही अधिक असते. त्यातच अनेक जिल्हा परिषद शाळांना पत्र्याचे शेड असल्याने उन्हाची तीव्रता वाढून मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

■ महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हा परिषदांनी शनिवारच्या शाळेच्या वेळेत बदल केला असल्याने जिल्हा परिषदांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविल्या जात आहेत. खासदार सुरेश म्हात्रे यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे मागणी केली होती.

उन्हाची तीव्रता पाहता शनिवारच्या शाळेची वेळ बदलण्यासंदर्भात आमचा पाठपुरावा चालू होता. विद्यार्थी हित लक्षात घेऊन शनिवारच्या शाळेच्या वेळेत वेळीच बदल केल्याने मुलांना दिलासा मिळाला आहे.

विनोद लुटे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती ठाणे