पाचव्या दिवशी टँकर्स चालकांचा संप मागे, महापालिकेने घेतल्या नोटिसा मागे; कोर्ट आणि सरकारकडे संघटना पाठपुरावा सुरूच ठेवणार

मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला वॉटर टँकर्स चालकांचा संप मुंबई वॉटर टँकर्स असोसिएशनने आज अखेर मागे घेतला. त्याचबरोबर मुंबई महापालिकेने विहिरी आणि बोअरवेल मालकांचे परवाना रद्द करण्याच्या कायदेशीर नोटिसा मागे घेतल्या.

केंद्रीय भूजल प्राधिकरणाने विहिरी आणि बोअरवेलच्या आजूबाजूची 2 हजार चौरस फुटांची जागा मोकळी सोडण्याचा नियम शिथिल करून एनओसी द्यावी, या मागणीसाठी कोर्टासह राज्य आणि केंद्राकडे पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे, अशी माहिती मुंबई वॉटर टँकर्स असोसिएशनचे सचिव राजेश ठाकूर यांनी दिली.

15 जूनपर्यंत एनओसी न घेतल्यास विहिरी आणि बोअरवेलमालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा पालिकेने दिला होता. मात्र महापालिका मुख्यालयात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याबरोबर टँकर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीनंतर हा संप मागे घेत असल्याचे असोसिएशनने जाहीर केले.

बैठकीला कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ, तर मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीने सचिव राजेश ठाकूर, उपाध्यक्ष हरबन्स सिंग, जीतू शाह, खजिनदार अमोल मांढरे यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य हजर होते.

केंद्राकडे बाजू मांडण्यासाठी पालिका टँकरचालकांना मदत करणार

टँकरचालक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी बैठकीत आपली बाजू मांडत संघटनेच्या मागण्या केंद्र सरकार आणि केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडे वेळोवेळी बाजू मांडण्यासाठी महापालिका प्रशासनाने मदत करावी, अशी विनंती संघटनेने केली आणि मागण्यांचे सविस्तर निवेदन महापालिका आयुक्तांना दिले. त्यावर केंद्र सरकारशी निगडित मागण्या व बाबी संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिका मदत करेल, असे आश्वासन आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले.