
>> विजय पांढरीपांडे
कशाच्याही संदर्भात निराश न होता उत्साहाने, खुल्या दिलाने, काहीशा लवचिक धोरणाने या बारावीनंतरच्या निर्णय प्रक्रियेला सामोरे जा. खास करून पालकांनी मुलाची आवड, त्याची क्षमता, त्याची भावनिक जडणघडण यांचा प्रामुख्याने विचार करावा. गर्दी जिकडे चालली आहे, तिकडे धावणे हा शुद्ध वेडेपणा झाला. जिथे गर्दी नाही तिथे जास्त संधी असते ही आशावादी वृत्ती ठेवावी. सर्वप्रथम अमुकच कोर्स, अमुकच संस्था हा दुराग्रह सोडला पाहिजे. आधी आपली बौद्धिक क्षमता बघा. आपल्याला काय सोपे जाईल त्याचा विचार करा.
बारावीचे निकाल लागले आहेत आणि विद्यार्थी, पालक यांची ‘पुढे काय?’ या प्रश्नासह धावपळ सुरू झाली आहे. यादरम्यान अनेकांनी आयआयटी, जेईई, नीट अशा प्रवेश परीक्षादेखील दिल्या आहेत. खरे तर प्रवेश मिळेल की नाही? ही चिंता करण्यासारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. राष्ट्रीय स्तरावरील सरकारी, खासगी अशा सर्व क्षेत्रांतील संस्थांची संख्या तसेच विविध कोर्सेसची प्रवेश संख्या कितीतरी पटीने वाढली आहे. आयआयटी, एनआयटीचा अपवाद सोडला तर अनेक राज्यांतील इंजिनीअरिंगच्या शेकडो जागा रिकाम्या राहताहेत. सायन्स, कॉमर्स, कला क्षेत्रांत तर सहज प्रवेश मिळेल अशी स्थिती आहे. तरी टेन्शन आहे ते मला हवा असलेला कोर्स/ विषय, मला हव्या त्याच संस्थेत मिळेल की नाही या अट्टाहासाचा आहे. हा दुराग्रह सोडला तर मग कशाचीच अडचण नाही. आजकाल राष्ट्रीय स्पर्धा प्रवेश परीक्षेत लाखोच्या संख्येने विद्यार्थी बसतात. ते गेली दोन-चार वर्षे टय़ुशनच्या चरकातून पिळून निघालेले असतात. प्रवेश परीक्षेचे निकाल पर्सेंटाइल स्वरूपात जाहीर होतात. त्यामुळे 95 पर्सेंटाइल असले तरी हवा तो कोर्स, हवा त्या संस्थेत न मिळण्याची भीती असतेच. कारण तुमच्या वरचे 5 टक्के विद्यार्थीच संख्येने इतके होतात की, त्या मोक्याच्या क्रीम सीट्स संपून जातात. हे गणित समजून घेतले पाहिजे. म्हणजे नैराश्य पचवायला सोपे जाईल.
भविष्यातील गरजा, नोकरी, करीअरचे स्वरूप लक्षात घेतले तर कोणताही कोर्स घेतला, कुठेही शिक्षण घेतले तरी वाव आहे,संधी आहे. कारण तुमचे करीअर हे कुठून, कोणत्या विषयात, कोणते ग्रेड्स मिळवून पदवी घेतली यावर मुळीच अवलंबून नसते. किंबहुना अनेक क्षेत्रांत तुम्ही पदवीसाठी जे काही शिकलात त्याचा मुळीच उपयोग होत नाही. पदवीमुळे तुम्ही कोणकोणती इतर काwशल्ये आत्मसात केलीत, नवे काही शिकण्याचा तुमचा उत्साह कितपत दांडगा आहे, तुमची वैचारिक निर्णय क्षमता, तार्किक विवेकाने विश्लेषण करण्याची क्षमता किती जागरूक आहे, यावर तुमचे करीअरचे भविष्य अवलंबून असते.
आजकाल संगणक,आयटी, एआय, एमएल वगैरेचे नको तितके स्तोम माजले आहे. या गोष्टी कुठेही केव्हाही शिकता येतात. त्यासाठी त्या विषयात पदवीच घ्यायला हवी असा आग्रह नको. अगदी सायन्स, कॉमर्सचे शिक्षण घेताना, घेतल्यानंतर या संगणकासंबंधीच्या विषयातले काwशल्य आत्मसात करता येते.
याचा अर्थ सर्वप्रथम अमुकच कोर्स, अमुकच संस्था हा दुराग्रह सोडला पाहिजे. आधी आपली बौद्धिक क्षमता बघा. आपल्याला काय सोपे जाईल त्याचा विचार करा. त्याचबरोबर आपल्या घरची पालकांची आर्थिक क्षमता बघा. आजकाल खासगी संस्था, विद्यापीठे अवाच्या सवा फी घेतात, पण त्या तुलनेत शिक्षणात गुणवत्ता, दर्जा असेलच याची खात्री नसते. अनेक ठिकाणी तो नसतोच. संस्था आपल्या घरापासून, शहरापासून किती दूर आहे, तिथला हॉस्टेलचा खर्च, एकटे राहण्याचा मानसिक ताण आपल्याला झेपणार आहे का? याचाही गांभीर्याने विचार केला पाहिजे. एरवी अशा बाबतीत घाईगर्दीने घेतलेले निर्णय पुढे पश्चात्तापास कारणीभूत ठरतात.
कोणताही कोर्स कमी दर्जाचा नाही. कोणतेही क्षेत्र कमी प्रतीचे नाही. नोकरीत मिळणारा पगार म्हणजे तुमचे एकूण उत्पन्न अन् तुमचे शिक्षण (पदवी) याचादेखील काडीमात्र संबंध नसतो. एक वकील दिवसाला आयआयटी इंजिनीअरच्या मासिक पगारापेक्षा जास्त कमाई करू शकतो हे सत्य, वास्तव आहे. (बिल्डर, राजकारणी नेते यांची उदाहरणे न दिलेली बरी!)
तेव्हा कशाच्याही संदर्भात निराश न होता उत्साहाने, खुल्या दिलाने, काहीशा लवचिक धोरणाने या बारावीनंतरच्या निर्णय प्रक्रियेला सामोरे जा. खास करून पालकांनी मुलाची आवड, त्याची क्षमता, त्याची भावनिक जडणघडण यांचा प्रामुख्याने विचार करावा. गर्दी जिकडे चालली आहे, तिकडे धावणे हा शुद्ध वेडेपणा झाला. जिथे गर्दी नाही तिथे जास्त संधी असते ही आशावादी वृत्ती ठेवावी.
आता सगळीकडे नाही तरी आपल्या महाराष्ट्रात नवे शैक्षणिक धोरण राबवणे सुरू झाले आहे. यात बरीच लवचिकता आहे. वेगवेगळ्या विषयांची आवडीनुसार निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे. शिकताना वेगवेगळी काwशल्ये आत्मसात करण्याचीदेखील संधी आहे. कृती शिक्षणावर, प्रॅक्टिकल अनुभवावर भर आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे ऑनलाइन कोर्सेस करण्याचे अन् त्याद्वारे कमावलेले व्रेडिट पदवीसाठी ग्राह्य धरण्याचे धोरण आहे. याची सर्व माहिती मिळवून (जी सर्व संस्थांच्या, कॉलेज-विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध असते) ती समजून घेऊन त्याचा लाभ घेतला तर कुणालाही निराश होण्याचे कारण उरणार नाही. उपलब्ध माहितीचा उपयोग आपल्या भल्यासाठी करून घेतला तर भविष्यातले अर्धेअधिक प्रश्न सहज सुटतील.अन् पुढील उच्च शिक्षण हा आनंददायी अनुभव ठरेल.
(लेखक ज्येष्ठ शिक्षक तज्ञ आहेत)