जयंत नारळीकर यांचे निधन, खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा निखळला

विश्व हे कोणत्याही सुरुवातीशिवाय, कोणत्याही अंताशिवाय स्थिर आणि विस्तारलेले आहे, असा दावा करून ब्रह्मांड उत्पत्तीच्या ‘बिग बँग’ सिद्धांताला आव्हान देणारे जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, लेखक, विज्ञानप्रसारक डॉ. जयंत नारळीकर आज अनंताच्या दिशेने निघाले. डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यातील घरी पहाटे झोपेत निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.

डॉ. नारळीकर यांनी आयुष्यभर आकाशाशी नातं जोडलं. ब्रह्मांडातील परिवर्तन, नवे सिद्धांत जगासमोर सादर करताना विश्वाची रहस्यं सोप्या शब्दांत उलगडली. त्यांच्या सुरस विज्ञानकथांनी विज्ञानाची गोडी लावली. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने खगोलशास्त्रातील तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

डॉ. नारळीकर यांचे पार्थिव बुधवारी सकाळी 11.15 ते 12 या वेळेत ‘आयुका’मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर वैपुंठ स्मशानभूमी, पुणे येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.