
खेड तालुक्यातील ग्रामीण भागासह शहराला गेल्या आठवडभरापासून पावसाने झोडपून काढले आहे. सोमवारी सकाळी तुफान पावसाने दैनंदिन जीवन कोलमडून गेले असून ग्रामीण भागात नदी, नाले ऐन मे महिन्यातच दुथडय़ा भरून वाहू लागले आहेत. आठवडभरापासून पडत असलेल्या पावसाचा जोर तालुक्यात कायम आहे. पहिल्या पावसाने ऐन मे महिन्यातच नद्यांच्या पात्रात वाढ झाली, तर ग्रामीण भागात ओढे दुथडय़ा भरून वाहत असल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केल्याने आगामी महिन्यात पाऊस किती कोसळू शकतो याचा अंदाज आता शेतकरी बांधू लागले आहेत.
सद्यस्थितीत ग्रामीण भागात काही ठिकाणी पेरणीची कामे सुरू झाली आहेत, तर काही ठिकाणी पावसामुळे अजून पेरणी सुरू झालेली नाही. अवकाळी पावसाने तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी मुसळधार पावसाने नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून ऐन मे महिन्यातच जगबुडी नदीपात्र 6 मीटर इशारा पातळी ओलांडून वाहू लागले आहे. आतापर्यंत तालुक्यात 85 मी. मी. पाऊस पडला आहे.
रत्नागिरीत आज रेड अलर्ट
रत्नागिरी जिह्यात पावसाने कहर केला आहे.मुसळधार पावसामुळे जनजीवन कोलमडून गेले आहे.खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.उद्या दि.27 मे रोजी रत्नागिरी जिह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. 28 आणि 29 मे ला रत्नागिरी जिह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.