लाडकी बहीण योजनेत चूक झाली! अजित पवार यांची जाहीर कबुली

महायुती सरकारने निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच लाडकी बहीण योजना आणली होती. त्या योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेवरही आली, पण आता या योजनेबद्दल वादंग निर्माण झाला आहे. त्यातच लाडकी बहीण योजना राबवण्यात चूक झाली अशी जाहीर कबुलीच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, दोन-तीन महिन्यांतच लगेच विधानसभा निवडणूक होणार होती, त्यामुळे घाईघाईत ही योजना सुरू केली गेली आणि अर्जदारांच्या पडताळणीसाठी वेळच मिळाला नाही.

गरजू नाहीत अशा महिलांनीही योजनेचे पैसे घेतले आहेत. तरीही ज्यांनी पैसे घेतलेत आणि नंतर त्या अपात्र ठरल्या आहेत त्यांचे पैसे काढून घेणार नाही.

आतापर्यंत अपात्र झालेल्या महिला

  • नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी – 7 लाख 70 हजार
  • संजय गांधी निराधार योजना – 2 लाख 30 हजार
  • 65 वर्षांपेक्षा जास्त वय – 1 लाख 10 हजार
  • चारचाकी वाहनांच्या मालक – 1 लाख 60 हजार
  • सरकारी नोकरी करणाऱया महिला – 2652

दोन महिन्यांचे तीन हजार रखडले

योजनेचा मे महिन्याचा हप्ता अजून बँक खात्यात जमा झालेला नाही. 2100 रुपये द्यायचे तेव्हा द्या, पण दीड हजार तरी वेळेवर जमा करा अशी मागणी लाडक्या बहिणी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मे आणि जून महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये येत्या 10 जून रोजी वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

लाभार्थींचे उत्पन्न किती? केंद्राला हवी माहिती

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला निकषात बसतात का हे पाहण्यासाठी विविध पद्धतीने आणि विविध विभागांकडून माहिती घेतली जात आहे. आता उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी थेट केंद्रीय अर्थ मंत्रालयालाही विनंती करण्यात आली असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून समजते.