अवकाळीची भरपाई 50 टक्के कमी केली

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले असताना महायुती सरकारनेही त्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. अवकाळीमुळे देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईच्या रकमेलाच सरकारने कात्री लावली आहे. भरपाईचे निकष बदलण्यात आले असून नव्या निकषांप्रमाणे पूर्वीपेक्षा 50 टक्के कमी भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱयांना अवकाळीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई देताना त्यात जिराईतसाठी प्रतिहेक्टरी 8500 रुपयांवरून 13600 रुपये अशी वाढ केली होती. बागायतीसाठीही 17 हजार रुपयांवरून 27 हजार रुपयांपर्यंत वाढ केली होती. नव्या शासन निर्णयानुसार यात कपात केली आहे. जिराईतीसाठी 13600 रुपये हेक्टरवरून फक्त 8500 रुपये आणि बागयतीसाठी 27 हजारांवरून 17 हजार रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. मदतीची मर्यादाही 3 हेक्टरवरून 2 हेक्टर करण्यात आली आहे. यावरून सरकारवर टीका होऊ लागली आहे.