सायबर घोटाळे रोखणार! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी E-Aadhaar वेरिफिकेशन आवश्यक

फेक युजर आयडीचा वापर करून रेल्वेच्या तिकिटाची बुकिंग करण्याच्या सायबर घोटाळ्याच्या आयआरसीटीसीने पर्दाफाश केला आहे. यासंदर्भात 2.5 कोटी फेक आयडीला ब्लॉक करण्यात आले आहे. सतत होणाऱ्या सायबर घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेने कंबर कसली आहे. भारतीय रेल्वे एक नवीन प्रणाली लागू करणार आहे. ज्यामुळे तत्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या वापरकर्त्यांना कन्फर्म तिकिटे मिळण्यास मदत होईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती शेअर केली आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सोशल मीडिया पोस्ट शेअर केली. भारतीय रेल्वे लवकरच तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी E-Aadhaar Authentication वापर सुरू करेल. यामुळे ग्राहकांना त्यांचे अनेक फायदे होणार आहेत. ही प्रणाली रेल्वेच्या वापरकर्त्यांना गरजेच्या वेळी कन्फर्म तिकिटे मिळविण्यास मदत करेल. या महिन्याच्या अखेरीस ही प्रणाली सुरू होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

सध्या आयआरसीटीसी वेबसाइट वापरणारे 13 कोटींहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. यापैकी फक्त 10 टक्के वापरकर्त्यांचीच आधार पडताळणी झाली आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यासाठीच आता भारतीय रेल्वे अनेक निर्णय घेत आहे. फक्त आधार पडताळणी केलेल्या आयआरसीटीसी धारकांनाच ऑनलाईन तत्काळ तिकीट बुकिंग करण्याची परवानगी मिळेल. ही प्रणाली सुरू झाल्यानंतर तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार आधारित ओटीपी ऑथेंटिकेशन आवश्यक असेल.

रेल्वेच्या तिकीट बुकिंग घोटाळ्याचा पर्दाफाश, आयआरसीटीसीकडून 2.5 कोटी फेक आयडी ब्लॉक