विजयाचा जल्लोष स्टेडियममध्ये व्हावा! गौतम गंभीरचा विजय यात्रेला विरोध

हिंदुस्थानने 2007 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हाही मी विजय यात्रेला पाठिंबा दिला नव्हता आणि मी त्याच मतावर ठाम आहे. या विजयोत्सवापेक्षा लोकांचे आयुष्य फार महत्त्वाचे आहे. असे आयोजन बंद दरवाजांमध्ये किंवा स्टेडियममध्ये व्हायला हवेत. जे चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर घडलं ते दुर्दैवी होतं. आपण सर्व या गोष्टींसाठी जबाबदार आहोत. या घटनेने आपण शहाणे व्हायला हवे. जेणेकरून भविष्यात असं काही घडणार नाही, अशा शब्दांत हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी परखड मत मांडले.

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीनंतर या दुर्घटनेबाबत चोहोबाजूंनी आरसीबी व्यवस्थापन, पोलीस यंत्रणा आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या निष्काळजीपणाबाबत जोरदार टीका करण्यात आली. तशीच टीका गौतम गंभीर यांनीही केली. इंग्लंड दौऱयावर हिंदुस्थानी संघ रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीरने आपले गंभीर मत मांडले. आपण या प्रकारच्या विजय यात्रांच्या विरोधात असल्याचे ठामपणे सांगितले आणि भविष्यात अशा विजय यात्रा किंवा रोड शो न काढता त्यांचे नियोजन स्टेडियममध्येच करण्याचा सल्लाही दिला.

नव्या दमाचा संघ

नव्या दमाचा संघ पाहून मीच नव्हे तर सर्व खेळाडू उत्साहित झाले आहेत. देशासाठी काही विशेष करण्याची प्रत्येकाला संधी आहे. आम्ही एक नवी सुरुवात करतोय, हे कुणासाठीही महत्त्वाचे नाहीय. आमच्याकडे काही खेळाडू खूप जबरदस्त असल्याचे सांगताना गंभीर यांनी या दौऱयात नवोदित खेळाडूंना अधिक संधी देण्याचे संकेत दिले आहेत. या दौऱयात नव्या खेळाडूंवर गंभीर यांचा अधिक विश्वास असल्याचेही त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.

जल्लोषापेक्षा जीव महत्त्वाचा, भविष्यात विजय परेडचा गांभीर्याने विचार करण्याचा कपिल देव यांचा सल्ला

रोहितविराटची जागा भरणे कठीण गिल

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे एका दशकापेक्षा अधिक काळ खेळले आहेत आणि त्यांनी हिंदुस्थानला अनेकदा विजयही मिळवून दिले आहेत. मात्र त्यांची जागा भरणे खूप कठीण आहे. पण हा आमच्यावर दबाव नाहीय. आम्हाला अशा दबावांची सवय झालीय, असे आत्मविश्वासपूर्ण विधान हिंदुस्थानचा नवोदित कसोटी कर्णधार शुभमन गिलने केलेय.

इंग्लंडमध्ये कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार याबाबत छेडले असता तो म्हणाला, फलंदाजी क्रमाचा कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. लंडनमध्ये आम्ही पुढील दहा दिवस सराव करणार आहोत. तेव्हाच आम्ही फलंदाजीच्या क्रमाबाबत निर्णय घेऊ, असेही गिलने स्पष्ट केले. तसेच मी नवखा असल्यामुळे माझ्या नेतृत्वाची काही विशेष शैली नाही. जसाजसा मला अनुभव मिळेल तसतशी माझी शैली तुमच्या समोर येईल. मला खेळाडूंबरोबर संवाद साधायला आणि त्यांच्याशी चर्चा करायला मला आवडते. माझ्यासाठी सर्व खेळाडूंशी नाते बनवणे सध्या खूप महत्त्वाचे असल्याचेही तो म्हणाला.

तीन कसोटीतच बुमरा खेळणार

जसप्रीत बुमरा इंग्लंड दौऱयात हिंदुस्थानचे मुख्य अस्त्र असेल. ही मालिका पाच कसोटी सामन्यांची असली तरी हिंदुस्थानी क्रिकेटची खरी संपत्ती असलेल्या बुमराला केवळ तीन कसोटीतच खेळविले जाणार असल्याची माहिती गंभीर यांनी दिली. मात्र तो कोणत्या तीन कसोटीत हिंदुस्थानच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणार हे मात्र संघाच्या कामगिरीवर आणि मालिकेच्या निकालावर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Bengaluru stampede – बंगळुरूतील चेंगराचेंगरीवर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला