
>> डॉ. सच्चिदानंद शेवडे
ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र आघातामुळे आकस्मिक निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 84 वर्षांचं होते. चार दिवस छातीत थोडासा कफ साचून त्यांना त्रास होत होता, परंतु ते घरीच विश्रांती घेत होते. त्याही स्थितीत त्यांना दोन विषयांवर त्यांच्या ‘अधोरेखित’ या यूटय़ूब वाहिनीवर भाष्यपट करायचे होते. ‘अधोरेखित’मधून ते विविध राष्ट्रीय व राजकीय विषयांचा परखड, परंतु संयमी भाषेत परामर्श घेत असत. बिनतोड युक्तिवाद आणि साधी, सोपी भाषा हे ‘अधोरेखित’चे वैशिष्टय़ होते. त्यांच्या बोलण्यात राष्ट्रवाद आणि हिंदुहिताची तळमळ असे. ‘अधोरेखित’चा आणखी एक विशेष म्हणजे प्रत्येक भाग चित्रित होत असताना अरविंदरावांच्या मागे छत्रपती शिवरायांचे वासुदेव कामतांनी रेखाटलेले देखणे चित्र दिसत असे. ‘अरविंद उवाच’ या शीर्षकांतर्गत त्यांनी काही काळ ब्लॉग लेखनही केले. हाडाचे पत्रकार असल्यामुळे नेमक्या शब्दांत मोठा आशय वाचकांपर्यंत पोचवण्यात त्यांची हातोटी होती. आचार्य अत्र्यांच्या ‘मराठा’मधून आपल्या पत्रकारितेला त्यांनी प्रारंभ केला. त्यानंतर दीर्घकाळ इंग्रजी भाषेतील ’मिड डे’मध्ये राजकीय संपादक या पदावर काम केले. महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत जवळून पाहणारा, त्यातून विविध पक्ष, संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी निर्माण झालेल्या संबंधांतून राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर आशयनिर्मिती करणारा, भाष्य करणारा एक लढवय्या पत्रकार म्हणून अरविंदराव सतत स्मरणात राहतील. असे असूनही त्यांनी राजकीय ओळखीचा कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी गैरफायदा घेतला नाही. छत्रपती शिवराय, स्वा. सावरकर, डॉ. हेडगेवार, पु. भा. भावे अशी श्रद्धास्थाने असलेल्या अरविंदरावांनी काही वर्षे साप्ताहिक ‘विवेक’, मासिक ‘धर्मभास्कर’चेही संपादन केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा त्यांच्यावर विलक्षण पगडा होता. छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील अनेक दाखले ते सहजपणे उद्धृत करीत असत. इतिहासाचा दांडगा व्यासंग असल्यामुळे हे शक्य होत असे.
आमचे सद्गुरू प.पू.ब्र.स्वामी वरदानंद भारती हे त्यांचे प्रेरणास्थान होते. गोरठे येथील दासगणू अभ्यास शिबिरात त्यांची अभ्यासपूर्ण व्याख्याने झाली होती. शिवसेनेच्या शिबीरातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची व्याख्याने आयोजली होती. ‘हिंदुस्थान समाचार’ या राष्ट्रीय वृत्तसंस्थेचे मुंबईतील ब्युरो प्रमुख म्हणूनही त्यांनी लक्षणीय काम केले होते. अनेक तरुणांना राष्ट्रीय विचाराच्या पत्रकारितेचे धडे दिले होते. जवळपास दशकभर पु.भा.भावे स्मृती समितीचे कार्यवाह म्हणून त्यांनी मुंबई आणि परिसरात अनेक उपक्रम केले होते. आम्हाला ‘पु.भा.भावे स्मृती वत्तृत्व पुरस्कार’ घोषित झाला होता. पुरस्कार प्रदानाच्या वेळी ते म्हणाले, ‘‘असे पुरस्कार चाळिशी/पंचेचाळिशीतच योग्य व्यक्तीला मिळायला हवेत. म्हणजे पुढे काम करण्याचा त्याचा हुरूप वाढतो आणि पुढे कर्तृत्व गाजवायला आणखी आयुष्यही असते!’’ प्रत्येक वेळी त्यांच्या येणाऱ्या दूरभाषामधून राष्ट्रहिताची तळमळ जाणवत असे. डाव्यांप्रमाणे राष्ट्रवादी विचारवंत, लेखक, व्याख्याते, कीर्तन-प्रवचनकार यांची एकजूट असायला हवी असे त्यांचे अत्यंत रास्त म्हणणे असे!
त्यांचा ज्येष्ठ मुलगा डॉ. मल्हार मुंबई आयआयटीमध्ये संस्कृत भाषा विभागप्रमुख आहे, तर केदार हा अरुणाचल प्रदेशात कल्याण आश्रमाचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून गेली जवळपास दोन दशके काम करीत आहे. ओंकार कुलकर्णी हा त्यांचा धाकटा मुलगा इंग्रजी भाषेतील कवी असून चित्रपट आणि मालिका क्षेत्रात लेखक – अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे.
एक राष्ट्रवादी विचारवंत, पत्रकार, मार्गदर्शक म्हणून अरविंद विठ्ठल कुलकर्णी हे नाव पत्रसृष्टीत कायम स्मरणात राहील!