खोटारड्या सरकारने पलावा पुलाचे काम अर्धवट ठेवले; पुन्हा एकदा तारीख पे तारीख

पलावा पूल उद्घाटनाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. याचा चांगलाच समाचार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी घेतला आहे. खोटारड्या सरकारने पलावा पुलाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे कल्याण, डोंबिवलीकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. येत्या महापालिका निवडणुकीत राज्यकर्त्यांना नागरिक चांगलाच धडा शिकवतील, असा इशारा त्यांनी दिला.

शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवली पश्चिम येथील रेल्वेच्या ५२ चाळ परिसरात शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी दीपेश म्हात्रे यांनी कल्याण, डोंबिवलीतील वाहतूककोंडीला भाजप आणि मिंधे गटाला जबाबदार धरले. ते म्हणाले, पलावा पूल सुरू नसल्याने मोठी वाहतूककोंडी होत आहे. डोंबिवली, कल्याण व वाशीला दररोज जाणाऱ्या नागरिकांची निराशा झाली आहे.

वारंवार तारखा देऊन लोकांची फसवणूक करणे हे सत्ताधाऱ्यांचे धोरण झाले आहे. हे सगळे खोटारडे आहेत, असा आरोप म्हात्रे यांनी केला. यावेळी जिल्हा संघटक तात्या माने, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, माजी नगरसेवक सुधाकर वायकोळे, महिला संघटक सुप्रिया चव्हाण, प्रियंका विचारे, उपशहरप्रमुख शाम चौगले, संजय पाटील, शाखाप्रमुख आकाश पाटील, राजेश पाटील, सूरज पवार आदी उपस्थित होते.