हरिनामाच्या जयघोषाने वरवंड दुमदुमले, तुकोबांचा पालखी सोहळा वरवंड मुक्कामी

‘रामकृष्ण हरी’चा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर करीत पंढरपूरच्या दिशेने निघालेला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातील यवत येथील मुक्काम आटोपून पंधरा किलोमीटरचा पायी प्रवास करत आज वरवंड येथे संध्याकाळी सहाच्या सुमारास दाखल झाला.

जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळय़ाने यवत येथून आज सकाळी आठ वाजता टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात वरवंडकडे प्रस्थान ठेवले. यावेळी सकाळचा नाष्टा, भांडगाव येथे दुपारचा विसावा व जेवण करत पालखी सोहळा वरवंडकडे मार्गस्थ झाला. यावेळी भांडगाव, वखारी, चौफुला येथील भक्तांना दर्शनासाठी काही काळ पालखी थांबविण्यात आली होती. केडगाव चौफुला येथील कला केंद्रातील नृत्यांगना यांनी वारकऱ्यांच्या विरंगुळासाठी कला सादर केली.

संध्याकाळी सहा वाजता तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वरवंड येथे दाखल झाला. यावेळी सरपंच योगिता दिवेकर व उपसरपंच बाळासाहेब जगताप यांनी पालखीचे स्वागत केले. ग्रामस्थांच्या वतीने पालखीची महाआरती करण्यात आली. वरवंड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पादुका मुक्कामासाठी व दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.

यावेळी यवत ते वरवंड मार्गावर तालुक्यातील अनेक भक्त, संघटना, संस्था यांनी पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांची चहा, नाष्टा, जेवणाची सोय केली होती.  दौंड पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवला होता. पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने चालू ठेवण्यात आली होती. तसेच आरोग्य केंद्राकडून चोवीस तास वारकऱ्यांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र उभारण्यात आले होते. दौंड तालुक्यातील यवत व वरवंड येथील दोन मुक्काम आटोपून पालखी उद्या सकाळी रोटी घाटामार्गे बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडीकडे मार्गस्थ होणार आहे.