
आषाढी वारीतील भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर समिती व्यवस्थापनाने, आज पासून श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दर्शन रांगेत पन्नास हजाराहून अधिक वारकरी भाविक उभे आहेत. पदस्पर्श दर्शनासाठी आठ ते दहा तासांचा अवधी लागत असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिलीय.
श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दिनांक 16 जुलै (प्रक्षाळपुजा) पर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे. श्रींचा पलंग काढताना पुजेवेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, ॲड माधवीताई निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.