पहिली ते चौथी इयत्तेत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही – शरद पवार

पहिली ते चौथी इयत्तेत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही. सरकारने तसा हट्ट करू नये. आज देशातील 55 टक्के लोक हिंदी बोलतात ती सुसंवादाची भाषा असू शकते. हिंदीबद्दल महाराष्ट्रात विरोध किंवा द्वेष नाही पण म्हणून हिंदीची सक्ती नको.अशी परखड भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना मांडली आहे

शरद पवार बोलताना म्हणाले की, यात दोन भाग आहेत. पहिली ते चौथी प्राथमिक तिथे हिंदीची सक्ती करणं योग्य नाही. पाचवीपासून हिंदी येणं त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने हिताच आहे. आज देशामध्ये जवळपास 55 टक्के लोक हिंदी बोलतात. दुसरी भाषा अशी 55 टक्के बोलली जात नाही. मराठी, कानडी, मल्याळम, बंगाली, ठराविक लोकसंख्या याचा आधार घेते म्हणून हिंदीला दुर्लक्षित करुन चालणार नाही. साधारणत: महाराष्ट्रात लोक हिंदीच्या विरोधात नाहीत. पहिली ते चौथी हा जो वयोगट आहे, त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच लादणं योग्य नाही. तिथे मातृभाषा महत्त्वाची आहे. असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गाबद्दलच्या सर्व बाजू समजून घ्याव्या लागतील. विरोध का आहे? त्यावर सरकारची भूमिका काय आहे? राज्य सरकारचा वित्त विभाग या प्रकल्पाचं अर्थनियोजन कसं करणार आहे? हे सर्व जाणून घेतल्यानंतरच शक्तिपीठ महामार्गाबद्दलच्या यश-अपयशाबद्दल भूमिका घेता येईल. वित्त विभागाने काय म्हटलय याची माहिती आलेली आहे. सरकारची बाजू ऐकायची म्हणतो, तेव्हा हे सुद्धा ऐकावं लागेल. पैसा लागेल, एवढा मोठा प्रोजेक्ट त्याच्यात किती यश येईल हे आज सांगता येणार नाही असेही शरद पवार यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, विविध देशांमधील तणावाबाबत कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार डोनाल्ड ट्रम्प यांना नसतानाही ते मी निर्णय घेतला असा दावा करतात. कुणाशी बोलतात हे माहिती नाही त्यामुळे त्यांची विधानं अस्वस्थ करणारी आहेत. युरोपात आणि मध्य पूर्वेत त्यांच्याबाबत नाराजी दिसते आहे. आपण शक्तिशाली आहोत म्हणून छोट्या देशांवर मतं लादणं योग्य नाही. ह्याबद्दल भारताने स्वच्छ आणि देशहिताची भूमिका घेतली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर जितके पंतप्रधान झाले, त्यांनी आखाती देशांच्या भावना नजरेसमोर ठेवून त्यांना नेहमी पाठिंबा दिला. आपण इस्राईलशी शेतीसंबंध ठेवले, पण कधीही राजकीय संबंध ठेवले नव्हते. पण आताच्या आपल्या भूमिकेमुळे आखाती देशात आपल्याबाबत गैरसमज होतोय हे चांगलं नाही. असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, अकारण पुण्याच्या नामांतराच्या वादाला उभारी देऊ नका. बाजीराव पेशव्यांचं नाव का दिलं पाहिजे, हे मला कळत नाही. शौर्य हेच जर परिमाण असेल तर अनेकांची नावे देता येतील. छत्रपती संभाजी महाराजांकडे शौर्य आणि त्याग कमी होतं का? त्यामुळे अकारण समाजांमध्ये अंतर वाढवू नका.असे शरद पवार म्हणाले.