सृजन संवाद – कुंभकर्णाची झोप

>> डॉ. समिरा गुजर जोशी

कुंभकर्ण रामायणात फार कमी कालावधीसाठी भेटतो, पण लहानपणी घरच्यांकडून मात्र “काय कुंभकर्णासारखी झोप आहे,’’ हे अनेकदा ऐकलेले असते. नुकताच एक लेख वाचनात आला. त्यामध्ये कुंभकर्णाच्या आपल्याला ठाऊक असलेल्या प्रकृती वा स्वभावाचे वैद्यकीय विश्लेषण केले होते. त्याकडे वळण्यापूर्वी आपल्याला जे ठाऊक आहे त्याकडे एक नजर टाकू.

रावणाला जेव्हा लक्षात आले की, युद्धात प्रभू श्रीरामांची सरशी होते आहे. तेव्हा त्याने मदतीसाठी आपल्या तिसऱया भावाला कुंभकर्णाला बोलवायचे ठरवले. कुंभकर्ण हा अजस्र राक्षस. त्याचा देह महाकाय! त्याचे खाणे अचाट… आणि झोप तर दीर्घ कालावधीची आणि गाढ. रावण म्हणतोच की तो झोपला की सहा, सात, नऊ कितीही महिने झोपू शकतो. आता तो असा का झोपतो, इतकं का खातो याची वैद्यकीय चिकित्सा करताना तो न्यूरोलॉजिकल विकाराने ग्रस्त असू शकतो असे ह्या लेखात म्हटले आहे. संशोधकांच्या मते, कुंभकर्णाला Kleine-Levin Syndrome (KLS) किंवा हायपोथॅलेमिक सिंड्रोम यांसारख्या झोपेसंबंधी विकाराने ग्रासले असावे. KLS ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे, ज्यामध्ये व्यक्ती दीर्घकाळ गाढ झोपते, जागे असताना प्रचंड भूक, असह्य राग किंवा मानसिक गोंधळ जाणवतो. कुंभकर्णाच्या कथेत दिसणारी लक्षणं-अत्यंत दीर्घ झोप, उठल्यावर असह्य भूक व रौद्र भावही या विकाराशी तंतोतंत जुळतात. विशेषत झोपेतून फक्त भुकेमुळेच जागे होणे आणि नंतर पुन्हा झोपेत जाणे हे या आजाराच्या क्लिनिकल लक्षणांना समर्थन देतात. अशा प्रकारे, रामायणातील ही पौराणिक कथा प्राचीन काळातील मानसशास्त्राrय व वैद्यकीय निरीक्षणांचे संकेत देणारी वाटते. हे वाचून गंमत वाटली. लेखातही म्हटले होते की, असे रामायणात अभिप्रेत असेल असे नाही, पण लोकांना एखादी गोष्ट समजून सांगताना अशी उदाहरणे उपयोगी असतात. मला ते पटले. पण मग मनात प्रश्न आला की रामायणात कुंभकर्ण असा असण्याचे काय कारण दिले आहे. खरे तर त्याच लेखात ब्रह्मदेवाच्या वरदानाच्या गोष्टीचा उल्लेख होता आणि तोही फार गमतीशीर! संशोधकांचे म्हणणे असे की, हा विकार असणाऱया व्यक्तींच्या बोलण्यातही एक प्रकारची अस्पष्टता निर्माण होते. त्यांचे बोलणे अडखळत किंवा उच्चार अस्पष्ट असतात. हेच कुंभकर्णाच्या बाबतीत आहे हे सांगण्यासाठी त्यांनी कुंभकर्ण आणि ब्रह्मदेव यांच्या गोष्टीचा उल्लेख केला होता. ती गोष्ट अशी की, कुंभकर्ण मुळात फार सामर्थ्यशाली असुर. त्याने मोठी तपस्या करून ब्रह्मदेवाला खुश करून घेतले. आता हा काय वर मागणार म्हणून सारे देव घाबरले. त्यांनी देवी सरस्वतीला विनंती केली. ती त्याच्या जिभेवर जाऊन बसली. कुंभकर्णाला वरदानात ‘इंद्रासन’ (इंद्राचे सिंहासन म्हणजेच त्याचे राज्य) हवे होते. पण देवी सरस्वतीने चातुर्याने शब्द बदलला. ज्याला अलीकडे आपण ‘स्लीप ऑफ टंग’ म्हणतो… ते घडले म्हणूया. त्याच्या तोंडून निघाले की ‘निद्रासन’ हवे. ह्या दोन शब्दातील भाषिक साम्य लक्षात घेऊन चतुराईने ह्या गोष्टीची रचना करण्यात आली आहे ह्यात शंका नाही. त्यात आधुनिक वैद्यकीय विश्लेषणात त्याची छान संगती लागते आहे. त्यामुळे कुंभकर्णाला या दुर्मिळ आजाराची सगळी लक्षणे बसतात.

पण वाल्मीकी रामायणात ही कथा येत नाही. आज परंपरेत ही गोष्ट बरीच लोकप्रिय आहे. मग असे कळले की, तामीळ भाषेतील कंबन रामायणात ही कथा येते म्हणे! पण मग वाल्मीकी रामायण काय सांगते? कुंभकर्णाला ब्रह्मदेवाचे वरदान नाही तर शाप आहे असे म्हटले आहे. कुंभकर्णाची भूक मुळातच खूप अधिक होती. तो सतत सगळ्या प्रकारचे प्राणी मारून खात असे. यामुळे लोक घाबरून गेले होते. अशाप्रकारे तो पृथ्वीवरील सगळ्या जिवांना खाऊन टाकेल अशी त्यांना भीती वाटत होती. देवांनाही त्याने त्रस्त करून सोडले होते. इंद्राला आणि यमालाही युद्धात हरवले होते. एकदा तर इंद्राच्या ऐरावताची सोंड जोरात पिरगाळून ती इंद्रालाच लागेल अशी फिरवली होती. ब्रह्मदेवांनीही जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा त्याचा प्रचंड आकार बघून तेही घाबरले. पण त्यांनी स्वतला सावरलं. त्यांनी म्हटलं की, विश्रवाने तुला लोकांच्या विनाशासाठीच निर्माण केले असावे, तेव्हा आता तू मेल्यासारखा झोपशील!

रावणाने मात्र ब्रह्मदेवाला सांगितले की, नात्याने कुंभकर्ण आणि मी, बिभीषण, आम्ही तुमची नातवंडे आहोत. तेव्हा तुम्ही असा शाप देणे बरोबर नाही. मग ब्रह्मदेवाने उःशाप दिला की, तो सहा महिने झोपेल आणि एक दिवसासाठी उठेल, पण त्या दिवशी तो अजिंक्य असेल. यामुळेच रावणाला कुंभकर्ण यशस्वी होईल याची खात्री वाटते आहे.

कथा आपले रूप कसे बदलतात याचे एक उत्तम उदाहरण कुंभकर्णाच्या शापाच्या कथेत पाहायला मिळते. या कथेची आणखी एक गंमत आहे. कुंभकर्णाला पाहून वानर घाबरू लागले तेव्हा बिभीषण म्हणाला की आपण वानर सैन्याला हा राक्षस नसून ‘यंत्र’ आहे असे सांगू. रामानेही त्याला अनुमती दिली. हे एक निर्जीव यंत्र आहे असे समजून वानर त्याच्यावर तुटून पडले. पण अलीकडे रामायणावरती भाष्य करणारे अनेक जण कुंभकर्ण खरंच एक यंत्र होतं असं मानू लागले आहेत. ब्रह्मदेवाने ‘विश्रवाने तुला पृथ्वीच्या विनाशासाठी निर्माण केले’ असे जे म्हटले आहे त्या वाक्याने कुंभकर्णाला यंत्र म्हणणाऱया पक्षाला अधिकच बळकटी येते. पण रामायणात ‘आपण असे वानरांना सांगूया’ असा स्पष्ट उल्लेख आहे. कुंभकर्ण राक्षसच आहे, यंत्र नाही. असे गोंधळ टाळण्यासाठी मूळ वाल्मीकी रामायण तपासून पाहणे गरजेचे ठरते.

[email protected]

(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृतमराठी वाङ्मयाची अभ्यासक आहे)