वाचावे असे काही- सोप्या जगण्यातले सत्य

>> धीरज कुलकर्णी

मराठी साहित्याच्या सुजाण वाचकांसाठी सत्यकथाहा शब्द फार महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय, प्रामुख्याने मराठी समाजात वाचनाबद्दलच्या जाणिवा प्रगल्भ होऊ लागल्या होत्या. या काळात मौज प्रकाशनाने सत्यकथामासिकाचा उपक्रम हाती घेतला. संपूर्ण महाराष्ट्रातून लिहिते लेखक मौजेने शोधून सत्यकथेच्या माध्यमातून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मधुकर धर्मापुरीकर आणि स्नेहा अवसरीकर या दोन सत्यकथाप्रेमींनी घेतलेल्या गेल्या काही वर्षांच्या अथक परिश्रमातून सत्यकथेतील निवडक कथांचे एक स्वतंत्र पुस्तक तयार करून वाचकांसमोर सादर केले, ते हे सत्वकथा!’

लघुकथा हा साहित्यप्रकार यशस्वीपणे हाताळणारे अनेक लेखक ‘सत्यकथे’च्या माध्यमामुळे तयार झाले. तसेच वाचकांच्याही मनाची मशागत करण्यास ‘सत्यकथे’ने हातभार लावला.

सत्तरच्या दशकाच्या पुढे समाजाच्या अभिरुचित लक्षणीय बदल होऊ लागले. वेगाने बदलणारे जग आवाक्यात आणणे ‘सत्यकथे’ला अवघड होऊन बसले. खप हळूहळू कमी होत गेला आणि 1982 ला ‘सत्यकथा’ मासिक बंद करावे लागले.

असे झाले तरी ‘सत्यकथे’तील साहित्याचे स्मरण करणारे रसिक आजही आहेत. कथेचे जुने अंक जिथे उपलब्ध असतील तिथून मिळवणारे संग्राहक आहेत. मधुकर धर्मापुरीकर आणि स्नेहा अवसरीकर हे असेच दोन ‘सत्यकथा’प्रेमी. या दोघांनी गेल्या काही वर्षांच्या अथक परिश्रमाने ‘सत्यकथे’तील निवडक कथांचे एक स्वतंत्र पुस्तक तयार करून वाचकांसमोर सादर केले, ते हे ‘सत्वकथा!’

हे पुस्तक तयार करताना फक्त कथानिवड करणे इतकेच न करता, जेवढे लेखक हयात आहेत, त्यांना संपादकांनी आवर्जून भेट दिली. त्यांना या उपक्रमाबद्दल सांगितले. त्यांना झालेला आनंद हीच संपादकांना मिळालेली खरी पावती होती.

‘देशमुख आणि कंपनी’ प्रकाशन संस्थेच्या प्रमुख मुक्ता गोडबोले यांनी या उपक्रमाचे महत्त्व जाणून त्यांना सर्वतोपरी पाठिंबा दिला आणि सर्व सहकार्य केले. त्यामुळे हे पुस्तक उत्तम स्वरूपात वाचकांना उपलब्ध झाले. श्री. पु. भागवत मौजेचे प्रमुख. ते साक्षेपी संपादक म्हणून ओळखले जात. ‘सत्यकथे’त छापून येणाऱया कथांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यात आवश्यक ते बदल करण्याची सूचना ते लेखकांना अवश्य करीत. यामुळे ‘सत्यकथे’तील कथांना एक विशेष दर्जा प्राप्त झाला.

प्रस्तुत संग्रहात 1961 ते 70 च्या दशकातील निवडक कथांचा समावेश करण्यात आला आहे. हा काळ निवडण्याची प्रमुख दोन कारणे आपण पाहायला हवीत. पहिली बाब म्हणजे साठ ते सत्तरचे दशक हे एकूणच समाजासाठी लक्षणीय बदलांचे होते, तसेच या दशकातील कथांमध्ये तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब तर आहेच. त्याचसोबत मराठी नवकथा ही या काळात जुना फॉर्म सोडून रचनेच्या अंगाने अनेक बदल करून घेत होती. संपादक म्हणतात त्याप्रमाणे कथेचे एकूण पर्यावरण शुद्ध असण्याचा हा काळ. संग्रहातील कथा वाचत असताना वाचकांना हे अवश्य जाणवते.

समाविष्ट केलेल्या सर्वच कथा उत्तम असल्याने त्यांमध्ये डावेउजवे करता येणे अवघड आहे. ‘तोल’ या मधू कुलकर्णी यांच्या कथेत कथा सांगण्याची उत्कटता दिसते, तर मो. दा. देशमुख यांनी आजोबा या कथेत जुन्या काळातील जुन्या व्यक्तींचे तीव्र रागलोभ असणारे एक उठावदार चित्र रंगवले आहे.

विलास मोहिते हे खरे तर राजबिंडे पोलीस अधिकारी, पण त्यांची ‘पाठवणी’ ही कथा तरल व सूक्ष्म भावभावना व्यक्त करणारी. मुलाला शिक्षणासाठी परगावी पाठवताना आईची होणारी तगमग फार सुंदर शब्दांत मांडली आहे.

बाळकृष्ण प्रभुदेसाई यांची प्रसिद्ध ‘जहाज’ ही कथा वाचकांना एका वास्तवापलीकडील जगाचा जाताजाता अनुभव देते.

रंगराव बापू पाटील यांची ‘मळा’, सुधीर बेडेकर यांची ‘यक्षी’ ल. म. आफळे यांची ‘जमाखर्च’, सोपान हाळमकर यांची ‘रेडू’ अशा उल्लेखनीय कथांमधून वाचक एक संपन्न अनुभूती घेतात.

एकूणच त्या काळातील समाजाचा वेग हा संथ होता. जगण्याची घाईगडबड नव्हती. हा ठहराव त्या कथांमध्येही प्रतिबिंबित झालेला दिसतो. आधुनिकतेचे त्या काळातील निकष आजच्यापेक्षा भिन्न होते. त्यामुळे आजच्या पिढीला या कथा वाचताना जुनी पिढी कशी राहिली असेल याचा अंदाज तर येतोच, पण त्यासोबत कथालेखनाच्या त्या काळातील प्रेरणांचा मागोवाही घेता येतो. काही कथांमध्ये आशय महत्त्वाचा आहे, तर काहींमध्ये पात्रे महत्त्वाची. तरीही लेखकाला जे सांगायचे आहे, ते निवडक शब्दांमध्ये वाचकांसमोर मांडण्याचे मोठेच काम लघुकथा करते.

पुस्तकाच्या सुरुवातीला संपादकांनी आपले मनोगत लिहिले आहे. त्यात कथानिवडीमागची भूमिका तसेच या पुस्तकाचे एकंदर प्रयोजन ते आत्मीयतेने स्पष्ट करतात. वाचकांनी ते अवश्य वाचावे. शेखर शिंपी यांचे मुखपृष्ठ पुस्तकाला साजेसे आहे. श्री. पु. भागवत व राम पटवर्धन यांनी मराठी वाचकांच्या मनात रुजवलेले हे सुंदर स्वप्न आजच्या पिढीच्या मनातही रुंजी घालेल यात शंका नाही.

[email protected]

सत्वकथा ः सत्यकथेतील निवडक कथा

संपादन ः मधुकर धर्मापुरीकर, स्नेहा अवसरीकर

प्रकाशक ः देशमुख व कंपनी प्रकाशन

किंमत ः रु. 350/-