राजीनामा देऊन दुसरी नोकरी करणाऱ्याला रोखू शकत नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

एखाद्याने राजीनामा दिल्यानंतर त्याला दुसरीकडे नोकरी करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. नवीन ठिकाणी नोकरी शोधण्यापासून प्रतिबंध करणारी मनमानी कलमेच न्यायालयाने अवैध ठरवली आहेत. न्या. तेजस कारिया यांच्या एकल पीठाने हा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला. हिंदुस्थान करार कायद्यातील कमल 27 नुसार नोकरी सोडणाऱ्याला कर्मचाऱ्याने दुसरीकडे नोकरी करू नये यासाठी कंपनी निर्बंध घालू शकत नाही, असे नमूद करत न्यायालयाने एका सॉफ्टवेअर इंजिनीअरला दिलासा दिला.

नोकरी करारातील नॉन-कंपीट क्लॉज वापरून या सॉफ्टवेअर इंजिनीअरला त्याची कंपनी दुसरीकडे काम करण्यापासून रोखत होती. न्यायालयाने ही अट चुकीची असल्याचा निकाल दिला. कर्मचाऱ्यावर दबाव आणता येणार नाही. आमच्याच कंपनीत नोकरी कर किंवा बेरोजगार हो, अशी सक्ती कर्मचाऱ्यावर केली जाऊ शकत नाही. नोकरी करारात अनेकवेळा जाचक अटी टाकल्या जातात. या अटी कर्मचाऱ्यावर दबाव आणणाऱ्या असतात. बहुतांशवेळा कर्मचाऱ्याला एका ठरावीक करारावर सही करावी लागते किंवा त्याला नोकरीच दिली जात नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

व्यवसाय करण्याला निर्बंध नाहीत

कोणत्याही व्यक्तीला व्यापार किंवा व्यवसाय करण्यापासून प्रतिबंध करणारे सर्व करार हिंदुस्थान करार कायदा कलम, 27 नुसार बेकायदा ठरतात.

गोपनीयतेचा गैरवापर करता येणार नाही

कर्मचाऱ्याकडे गोपनीय माहिती आहे. त्याला नोकरी सोडता येणार नाही, अशी सक्ती कंपनी करू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. अमेरिकन एक्सप्रेस बँक लि. विरुद्ध प्रिया मलिक खटल्यात 2006 मध्ये न्यायालयाने दिलेल्या निकालाचा दाखलाही न्या. कारिया यांनी दिला. नोकरी बदलणे कर्मचाऱ्याचा अधिकार व स्वातंत्र्य आहे. कंपनीची माहिती किंवा डेटा कर्मचाऱ्याकडे आहे याचा दाखला देत या अधिकारावर गदा आणली जाऊ शकत नाही, असा निर्वाळा या निकालाने दिल्याचे न्या. कारिया यांनी नमूद केले.