
पेजयल प्रकल्पासाठी खणलेल्या खड्ड्यात खोदकाम करताना अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने 15 जण दबले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने सर्वांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत चौघांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील जंगी का नागला या गावात रविवारी सकाळी दुर्घटना घडली. या गावात चंबळ पेयजल प्रकल्पाचे खोदकाम सुरू आहे. रविवारी सकाळी गावकरी या खड्ड्यात माती खोदत होते तेव्हा त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडला. यात 15 जण गाडले गेले.
बचाव पथकाने सर्वांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. यापैकी चौघांचा मृत्यू झाला असून अन्य 11 जण जखमी आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहेत.