
महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जमाफीचे खोटे आश्वासन देत सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.आता शेतकऱ्यांनीच सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर फिरकू देऊ नये, अशी घणाघाती टीका प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी यांना रस्त्यावर फिरकूच नाही दिलं पाहिजे. जिथं भेटेल तिथं ठोकलं पाहिजे, असा संतापही बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. भाजप नेते बबनराव लोणीकर तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या विधानावर त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
85 हजार कोटीचा महामार्ग आम्ही मागितला नाही. तो सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर थोपवू नये. भूमीरूपी खऱ्या शक्तिपीठाचे रक्षण महत्वाचे आहे आणि म्हणूनच शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या सर्व संघटनांना आमचा पाठिंबा आहे. धनधान्य देणारी काळी आई ही खरे शक्तिपीठ आहे. तिच्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्याला न्यायाचा महामार्ग खुला करून देणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले. शोतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे सरकार सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.