
मराठी माणूस एक झाला आहे, मराठी माणसाची एकजूट दिसत आहे, त्यामुळे महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याची इच्छा असणाऱ्या महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजप आणि गद्दारांच्या पोटात दुखणारंच, असा सणसणीत टोला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज लगावला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यानंतर भाजप आणि मिंधे गटात अस्वस्थता आहे. त्या अस्वस्थतेमधून त्यांचे नेते काहीही बरळत सुटले आहेत. त्यासंदर्भात आदित्य ठाकरे यांना आज प्रसारमाध्यमांनी विचारले असता, महाराष्ट्रद्वेष्ट्यांची कितीही पोटदुखी झाली तरी मराठी माणसाच्या एकीचा आनंद राज्यभरात दिसत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मराठी माणसाची तुलना पाकिस्तानी दहशतवाद्यांशी करणाऱ्या भाजपच्या मनात महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल किती द्वेष आहे हे उघड झाले, असे म्हणत त्यांनी भाजपचे आशीष शेलार यांच्यावरही निशाणा साधला.
मिंधे गटालाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी चांगलेच फटकारले. छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारे आमदार संजय गायकवाड यांच्यावर मिंधे गटाचे प्रमुख कारवाई करणार की सत्तेसाठी खपवून घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे, असे ते म्हणाले. प्रताप सरनाईक यांनी शिंदेंना लिहिलेल्या पत्राबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ती केवळ नौटंकी आहे. फोनही करता आला असता. हे सर्व सत्तेसाठी सुरू आहे. प्रत्यक्षात त्या दोघांमध्ये अनेक वाद आहेत.
महायुती सरकार फक्त जनतेला गाजर दाखवतेय
आदित्य ठाकरे यांनी यावेळी महायुती सरकारचाही समाचार घेतला. राज्यातील जनतेच्या प्रश्नांबाबत महायुती सरकार संवेदनशील नाही, राज्यासमोर अनेक प्रश्न असतानाही सरकार फक्त गाजर दाखवण्याचे काम करत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. गेल्या आठवड्यात 750 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण त्याबाबत आवाज उठवल्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदाराला सभागृहातून निलंबित करण्यात आले. दुसऱ्या दिवशीही तो मुद्दा उपस्थित केला तरीही सरकारला जनतेच्या प्रश्नांशी घेणेदेणे नाही. कारण हे सरकार राज्याचे नसून निवडणूक आयोगाचे आहे, असा जोरदार हल्ला आदित्य ठाकरे यांनी केला.