महादेवीसाठी महाएल्गार… 45 कि.मी. पदयात्रा, माधुरीला परत आणले नाही तर भाजप सत्तेत राहणार नाही; कोल्हापूरकरांचा संताप

महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नांदणी येथील भट्टारक जिनसेन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी रविवारी हजारो कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले. गुजरातच्या ‘वनतारा’कडून माधुरी परत मिळावी, या मागणीसाठी भल्या पहाटेपासूनच ग्रामस्थ आणि भक्तांनी नांदणीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तब्बल 45 किमी अंतर मूकमोर्चा काढला. माधुरीला गुजरातमधून परत आणले नाही तर भाजप सत्तेत राहणार नाही, याद राखा, अशा शब्दांत कोल्हापूरकरांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

45 किमी पदयात्रा काढून सायंकाळी कोल्हापुर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चाच्यावतीने थेट राष्ट्रपतींच्या नावे दयेचा अर्ज करण्यात आला. सर्वपक्षीय दहा महिलांच्या शिष्टमंडळाद्वारे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. पेटाच्या तक्रारीनंतर न्यायालयीन निर्णयानंतर नांदणी मठातील महादेवी हत्तीण गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्यात आली. त्यामुळे नांदणीसह पंचक्रोशीतील हजारो नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.  कोल्हापूरसह परिसरातील लोकप्रतिनिधी, नागरिक आणि विविध संघटनांनी ‘महादेवी’ला  पुन्हा मठात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर श्री 1008 भगवान महावीर जयंती उत्सव समिती, इचलकरंजी आणि समस्त जैन बांधवांच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय मूक पदयात्रा काढण्यात आली. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये जनक्षोभ उसळला असतानाच ‘वनतारा’ वन्यजीव संरक्षण व पुनर्वसन पेंद्राने माधुरी हत्तीणीला कोल्हापूरमध्ये माघारी पाठवण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत नियमांचे पालन केले पाहिजे, असे ‘वनतारा’ने नमूद केले.  

भाजपचे हे फसवे हिंदुत्व, ढोंगीपणा मुंबई मनपा निवडणुकीत उघड करणार

एकीकडे भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष हिंदुत्ववादी असल्याचा टाहो पह्डतात. पण लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नांदणी मठाच्या ‘महादेवी’ हत्तीणीबाबत भाविकांच्या भावना तीव्र असताना ते गप्प का आहेत. उलट आणखी तीन मठातील माणसाळलेले हत्ती घेऊन जाण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे भाजपचे हिंदुत्ववाचे प्रेम बेगडी आहे. त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीवेळी मुंबईत जाऊन त्यांचा ढोंगीपणा उघड करणार, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह पदयात्रेत सहभागी तरुणांनी दिल्या.

माधुरीच्या जिवाशी खेळ केला!

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील 743 गावांच्या जिनसेन मठ नांदणी यांच्या महादेवी हत्तीणीला पेटा व वनतारा यांनी चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीररीत्या वनतारा येथे पाठविले आहे. गेल्या जवळपास 450 वर्षांपासून या मठाच्या माध्यमातून हत्ती पाळले जात आहेत. सांस्कृतिक, धार्मिक व ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या महादेवीचे (माधुरी) गेली 33 वर्षे या मठामध्ये संगोपन व पालनपोषण केले गेले आहे. महादेवी ही गळय़ातील ताईत बनली आहे. ‘माधुरी’ आजारी होती तरी तिला सलग 48 तास प्रवास करून वनतारा जामनगर येथे कोणत्या नियमान्वये नेले, असा सवाल कोल्हापूरकरांनी केला. वनतारा येथे घेऊन जाण्याआधी गावातून काढलेल्या मिरवणुकीत ‘महादेवी’च्या डोळय़ांतूनही अश्रू ढळत होते. या घटनेमुळे लोकांच्या जनभावना आक्रमक झाल्या आहेत.