भटक्या कुत्र्यांना सांभाळण्याचा खर्च हजारो कोटींचा, रस्त्यावर उंदीर उच्छाद मांडणार; भाजप नेत्या मेनका गांधींनी व्यक्त केली भिती

भाजपाच्या माजी खासदार मेनका गांधी यांनी भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला ‘अव्यवहार्य’ असल्याचं म्हटलं आहे. भटक्या कुत्र्यांना सांभाळण्यासाठी सरकारला हजारो कोटी रुपयांचा खर्च येईल. इतकंच नाही तर भटक्या कुत्र्यांना हटवलं तर रस्त्यावर उंदिर उच्छाद मांडतील अशी भिती गांधी यांनी व्यक्त केली आहे.

मेनका गांधी म्हणाल्या की दिल्लीमध्ये साधारण 3 लाख भटके कुत्रे आहेत. त्यांना हटवण्यासाठी किमान 3 हजार शेल्टर बांधावे लागतील. यात पाणी, स्वयंपाकघर, छप्पर आणि रखवालदाराची सोय करावी लागेल. या सर्वासाठी जवळजवळ 15 हजार कोटी रुपये खर्च येईल. दिल्लीकडे एवढे पैसे आहेत का? असा सवाल मेनका गांधींनी विचारला आहे.

शेल्टरमधील कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी आठवड्याला 5 कोटी रुपये लागतील, ज्यामुळे जनतेत नाराजी पसरू शकते. कुत्रे हटवल्यानंतर काय-काय तोटा सहन करावा लागेल? भटके कुत्रे हटवल्यानंतर समस्या कमी होणार नाहीत. दोन दिवसांत गाझियाबाद आणि फरीदाबादहून लाखो कुत्रे दिल्लीमध्ये येतील कारण येथे अन्न आहे. भटके कुत्रे हटताच माकडे जमिनीवर उतरतील असे मेनका गांधी म्हणाल्या.

भटके कुत्रे हटवले तर उंदरांचा त्रास वाढेल. 1880 च्या दशकात पॅरिसमध्ये कुत्रे-मांजरी रस्त्यावरून हटवल्यानंतर संपूर्ण शहर उंदरांनी व्यापले होते असेही मेनका गांधी म्हणाल्या.

मेनका गांधी यांनी आरोप केला की सर्वोच्च न्यायालयाने एका वृत्तपत्राच्या ‘खोट्या’ अहवालाच्या आधारे हा निर्णय दिला. त्या अहवालात म्हटले होते की कुत्र्याने एका मुलीला चावले आणि तिचा मृत्यू झाला. पण प्रत्यक्षात तिचा मृत्यू मेंनिन्जायटिसमुळे झाला होता. त्यांनी दावा केला की ७० टक्के चावण्याच्या घटना पाळीव कुत्र्यांमुळे होतात, फक्त ३० टक्के भटके कुत्रे अशा घटनांमध्ये सामील असतात असेही गांधी म्हणाल्या.