
कालच्या सामन्यावर दीड लाख कोटींचा सट्टा खेळला गेला असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच यापैकी 25 हजार कोटी रुपये पाकिस्तानला गेले असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कालच्या सामन्यावर दीड लाख कोटींचा सट्टा खेळला गेला. कालच्या सामन्यातून एक हजार कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले. दीड लाख कोटी जुगारातले किमान 25 हजार कोटी पाकिस्तानला गेले. हा पैसा आमच्या विरोधात वापरला जाणार, हे काय सरकारला कळत नाही. हे गृहमंत्री अमित शहा आणि जय शहा यांना कळत नाही. सुनील गावस्कर म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची जरी इच्छा नसली तरी सरकारने परवानगी दिली आणि सरकारने खेळायला भाग पाडलं. सरकारने हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता, हे सुनील गावस्करसारखा टोलेजंग क्रिकेटपटू सांगतोय हे लक्षात घ्या.
तसेच क्रिकेट मॅच आणि दहशतदवाद चालणार नाही हे बाळासाहेबांनी सांगितलं. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करावं असे संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे गट अमित शहांचे बुट चाटणार, जय शहांची पालखी वाहणार, मिंध्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये. तुम्ही घरात बसून भारत पाक सामना बघणार आणि आमच्या राष्ट्रवादावर प्रश्न विचारणार.
राष्ट्रवादावर प्रवचनं झोडायची आणि पाकिस्तानसोबत क्रिकेटचे सामने खेळायचे, ही त्यांनी भारताची केलेली xyz च आहे. मी दुसरा शब्द वापरणार नाही, भारताच्या राष्ट्रभक्तीची आणि हिंदुत्वाची त्यांनी xyz च केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबात बोललं तर बरं होईल. यशवंतराव चव्हाणांनंतर शरद पवारांसारखं महाराष्ट्रात नेतृत्व आहे. तुमच्यात असे नेतृत्व निर्माण झाले नाही ही तुमची पोटदुखी आहे. शरद पवारांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचा नक्की प्रयत्न दिला आहे. राजकीय वैचारिक मतभेद असू शकतात. पण तुम्हाला मोदींनी मुख्यमंत्रीपदी चिकटवलं म्हणून तुम्ही नेते आहात. पूर्वीच्या काळात जसे सरकारी खात्यात चिकटवायचे तसे फडणवीसांना चिकटवलं म्हणून ते नेते आहेत. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही नेतृत्व जनतेने तयार केली. ही कर्तबागर नेतृत्व होती, तुमच्यासारख्या चिकटवलेली नेतृत्व नाही असेही संजय राऊत म्हणाले.