दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर स्लीपर बस पेटली, दोघांचा मृत्यू; 12 जण जखमी

मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेवर 42 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्लीपर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कोटा जिल्ह्यातील अरनखेडा गावाजवळ पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

आगीत बस जळून खाक झाली आहे. मृतांमध्ये चालकाचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारादरम्यान जखमींना कोटा येथे रेफर करण्यात आले.

अज्ञात वाहनाने बसला धडक दिल्यानंतर बस डिव्हायडरवर धडकली आणि आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. याप्रकरणी अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहेत.