मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या एकूण 749 अतिरिक्त फेऱ्या

मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, सुरू असलेल्या विकासाच्या कामे पूर्ण झाल्यानंतर पुढील चार ते पाच वर्षांत लोकल गाड्यांच्या सेवांमध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर 584 आणि पश्चिम रेल्वेवर 165 अशा मिळून शेकडो अतिरिक्त लोकल सेवा चालवल्या जातील. त्यामुळे गाड्यांमधील गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायक होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

पश्चिम रेल्वेवर लवकरच मुंबईतून 65 नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची योजना आहे. त्यासोबतच विद्यमान गाड्यांमध्ये दररोज 70 डबे वाढवले जाणार आहेत. मध्य रेल्वेवरही 30 नवीन आऊटस्टेशन गाड्या सुरू होणार आहेत. या योजनांसाठी विविध विकासाची कामे जलद गतीने सुरू आहेत. यात परळ–कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका, कुर्ला येथे हार्बर लाईनसाठी डेक, तसेच कल्याण–कसारा तिसरी आणि चौथी मार्गिका उभारणी यांचा समावेश आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते विनीत अभिषेक यांनी सांगितले की, ही विकासाची कामे पूर्ण झाल्यानंतर उपनगरी आणि मुख्य मार्गिकेवरील वाहतूक वेगळी केली जाईल. त्यामुळे गाड्या अधिक वेळेवर आणि सुरळीत धावतील. बोरीवलीपर्यंत सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर 20 नवीन लोकल सेवा सुरू केल्या जातील आणि नवीन एसी रेक्स उपलब्ध होताच एसी लोकल सेवाही वाढवली जाईल. सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज 1,406 लोकल सेवा 116 रेक्सच्या मदतीने चालवल्या जातात, तर मुंबई विभागातून 44 लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात.

दरम्यान गोरेगाव–बोरीवली हार्बर लाईनचा विस्तार वेगाने सुरू आहे. बांद्रा–अंधेरी दरम्यान प्लॅटफॉर्मची लांबी 15 डब्यांपर्यंत वाढवण्याची योजना आहे. नायगाव–जुईचंद्रा दुहेरी कॉर्ड लाईनचे सुमारे 176 कोटी रुपयांचे कामही सुरू असून त्यामुळे वसई रोडवर इंजिन बदलण्याची गरज न पडता कोकण रेल्वेशी थेट जोडणी मिळणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांना कोकण आणि गोव्याच्या दिशेने अधिक जलद व सोयीची सेवा मिळेल. कांदिवली–बोरीवली सहाव्या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. एकूणच, टर्मिनलचा विस्तार, देखभाल व गाड्या उभा करण्यासाठीच्या सोयी वाढवून मुंबईतील रेल्वेची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा रेल्वेचा मानस आहे.