
आम्ही खात्रीने सांगतो की मतदानाचा टक्का घसरणार नाही. मराठी माणूस मोठ्या संख्येने मतदान करेल असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच महापालिका जिंकल्यानंतर पुढील लढाईला सुरुवात होईल असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, पाडा मशीनबद्दल संजय राऊत म्हणाले की, ही अपवादात्मक परिस्थिती लोकसभेला का नव्हती, विधानसभेला का नव्हती किंवा देशात इतरत्र का नव्हती, फक्त मुंबईतच का? अशी परिस्थिती मुंबईच्या बाहेर नाशिक, पुणे, संभाजीनगर, ठाणे येथे निर्माण होणार नाही याची खात्री काय? ईव्हीएम यंत्र बिघडणे, त्याला बॅकअप, चार्जिंग सिस्टीम लागणे हे लोकसभेलाही झाले आहे, विधानसभेलाही झाले आहे, नगरपालिकेलाही झाले आहे. मुंबईसह एकूण 28 महानगरपालिकांमध्ये मतदान होत आहे. नागपूर, उपराजधानीत हे होऊ शकते, तर हे पाडा-घाला तिथे का नाही? फक्त मुंबईतच का? हा एक गंभीर प्रश्न आहे असे संजय राऊत म्हणाले.
आम्ही खात्रीने सांगतो की मतदानाचा टक्का घसरणार नाही. मराठी माणूस मोठ्या संख्येने मतदान करेल. भारताच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशात असलेली मराठी माणसे सुट्टी घेऊन मुंबईत मतदानासाठी आली आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. मोठ्या प्रमाणावर परदेशातील मराठी माणसे आपल्या मुंबईसाठी, आपल्या मराठी अस्मितेसाठी मतदान करायला येत आहेत. उद्धवजी आणि राजजी यांनी दिलेली हाक मराठी माणसापर्यंत जगाच्या पाठीवर पोहोचली आहे असे संजय राऊत म्हणाले.
लोकांनी ठरवले आहे. उद्धवजी आणि राजजी यांनी निर्माण केलेली जागरूकता, केलेले जागरण आणि तयार केलेले वातावरण यामुळे लोकांमध्ये “आपण मतदान केलेच पाहिजे” ही भावना निर्माण झाली आहे. हे मतदान मुंबई आणि महाराष्ट्रासाठी आहे. यावेळी प्रथमच मतदार सावध, जागरूक आणि कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेला दिसत आहे.
महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या भावनेलाच हात घातला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये, कर्नाटकात, पंजाबमध्ये, उत्तर प्रदेशात, बिहारमध्ये सर्वत्र आपापल्या भाषिकांच्या भावनांना हात घातला जातो. मग महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाच्या भावनेला हात घातला जातो, तर प्रश्न कसे काय विचारले जातात?
मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे. तिथे नाही जायचे, तर कुठे जायचे? त्यांनी आम्हाला आवाहन करावे की तुम्ही मुंबादेवीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. ती त्यांच्या बापाची देवी आहे का? देवी मुंबईची आहे. मुंबादेवीवरूनच मुंबईचे नाव आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई घडवली, नामांतर केले. हे लोक घाबरलेले आहेत, त्यांचे पाय लटपटत आहेत. सातबारावर बेकायदेशीरपणे मुंबईच्या नावावर आपले नाव टाकता येईल, असे त्यांना वाटते. पण आमच्या बाप-जाद्यांची मुंबई आम्ही कुणालाही देणार नाही. मुंबई मराठी माणसाची आहे, मुंबादेवी मराठी माणसाची आहे. भाजपला हा इतिहास माहिती नाही, कारण त्यांचा मराठी माणसाच्या भावना आणि संवेदनांशी काहीही संबंध नाही असेही संजय राऊत म्हणाले.































































