
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 10 गट आणि पंचायत समितीच्या 20 गणांमध्ये 5 फेब्रुवारी रोजी 271 मतदान केंद्रांवर एकूण 2 लाख 4 हजार 496 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 लाख 45 पुरुष मतदार, तर 1 लाख 4 हजार 441 महिला मतदार आहेत अशी माहिती उपविभागीय अधिकारी व निवडणूक अधिकारी जीवन देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मतदानासाठी तालुक्यात एकूण 271 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘सखी’ मतदान केंद्रे, दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र केंद्रे आणि काही ‘आदर्श’ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंगच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार असल्याची माहिती जीवन देसाई यांनी दिली. रत्नागिरी तालुक्यात एकूण 10 जिल्हा परिषद गट आणि 20 पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. प्रशासनाने या निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, 16 जानेवारी रोजी निवडणुकीची अधिकृत सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. 16 ते 21 जानेवारी या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. मात्र 18 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 22 जानेवारी रोजी प्राप्त अर्जांची छाननी केली जाईल, तर 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. निवडणुकीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच मतदान 5 फेब्रुवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन 10 फेब्रुवारीपर्यंत नवनिर्वाचित सदस्यांची नावे अधिकृतरीत्या जाहीर केली जातील.
निवडणुकीसाठी 707 अधिकारी-कर्मचारी
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी एकूण 707 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. यामध्ये 34 क्षेत्रीय अधिकारी, 298 मतदान केंद्राध्यक्ष आणि 281 मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संपूर्ण तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक खर्चावर मर्यादा घालण्यात आली आहे. जिल्हा परिषद गटातील उमेदवाराला 6 लाख रुपये, तर पंचायत समिती गणाातील उमेदवाराला 4.50 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी आहे. निवडणूक अर्जांची छाननी उपविभागीय अधिकारी कार्यालयात होईल, तर मतमोजणी कुवारबांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडणार आहे.
जिल्हापरिषद निवडणुकीत मार्कर वापरणार
जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांच्या हाताच्या बोटावर मार्करचीच शाई लावली जाणार आहे.
4 हजार 531 दुबार मतदार
रत्नागिरी तालुक्यातील दहा जिल्हापरिषद गटात 4 हजार 531 दुबार मतदार आढळले आहेत. त्यांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे. ते ज्या मतदान केंद्रात मतदान करणार आहेत, त्याची नोंद घेण्यात आली आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली.
































































