भाजपने परवानगी दिली तर नामोनिशाण मिटवून टाकू, नाईकांनी शिंदे यांना पुन्हा डिवचले

भाजपने परवानगी दिली तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून घोडे फरार नाही तर बेपत्ता करीन, असा थेट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी महापालिका निवडणुकीच्या काळात दिला होता. आता निवडणुका संपल्या तरी गणेश नाईक स्वस्थ बसायला तयार नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचले आहे. वरिष्ठांनी घोड्यांचे लगाम खेचल्याने ठाणे, कल्याण व उल्हासनगरातील भाजपचे काही कार्यकर्ते नाराज झाले आहेत. नाही तर तिन्ही ठिकाणी भाजपचाच महापौर बसला असता, असे सांगत नाईक यांनी आता जरी भाजपच्या वरिष्ठांनी परवानगी दिली तरी यांचे नामोनिशाण संपवून टाकेन, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांना आज इशारा दिला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील राजकारण ऐन थंडीत पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या पाचपाखाडी परिसरातील माघी गणेशोत्सवाला वनमंत्री गणेश नाईक यांनी आज हजेरी लावली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना नाईक यांनी ठाण्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, आम्हाला इथे युती नकोच होती. नवी मुंबईतही वाटाघाटी करताना १११ पैकी ५७ जागा शिंदे गटाने मागून मोठा भाऊ होण्याचा प्रयत्न केला. मात्र अवघ्या २० ते २२ जागांवर त्यांना थांबवून या ठिकाणी आम्ही भाजपची एक हाती सत्ता आणली. ठाण्यात मात्र भाजपच्या घोड्यांचे लगाम खेचले गेले असून आमचे कार्यकर्ते नाराज असल्याचे नाईक यांनी सांगितले.

निवडणूक कार्यकर्त्यांची असते

निवडणुका संपल्यानंतर गणेश नाईक शिंदे गटावर टीका करण्याचे थांबवतील असे अनेकांना वाटत होते. पण त्यांनी पुन्हा एकदा शिंदे यांच्यावर टिकास्र सुरू केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते, एकदा त्यांना लढू द्या, जास्त संख्या त्यांचा महापौर, हे मी मत मांडले. काही ठिकाणी ही संधी मिळाली तर काही ठिकाणी मिळाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात करामत करता आली नाही

ठाणे, मीरा-भाईंदर, उल्हासनगर या ठिकाणी मी यापूर्वी महापौर बसवले आहेत, त्यामुळे बालेकिल्ले कुणाचेही नसतात असा सूचक इशारा गणेश नाईक यांनी ठाण्यात येऊन शिंदे गटाला दिला आहे. जी करामत मी नवी मुंबईत केली ती करामत ठाण्यातील लोकांना करता आली नाही. ठाणे, कल्याण, उल्हासनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची परवड झाली. युती होऊ नये हे माझे खासगी मत होते. जर या निवडणुकीत भाजपला एकटे सोडले असते, तर ठाण्यात भाजपच्या एकट्याचे सभागृह दिसले असते असेही नाईक यांनी सांगितले.