हैदराबादच्या निजामाचे 173 मौल्यवान दागिने RBI च्या तिजोरीतच राहणार

हैदराबादच्या निजामाचे 173 मौल्यवान दागिने 1995 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच आरबीआयच्या वॉल्टमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत जतन केले आहेत, ते तूर्तास तरी तिथेच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. हे दागिने कायमस्वरूपी प्रदर्शनासाठी हैदराबादला हस्तांतरित करण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नसल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.

स्वातंत्र्यानंतर भारतीय संघराज्यात विलीन झालेल्या हैदराबाद संस्थानाच्या शासकांचे हे ऐतिहासिक दागिने आरबीआयच्या सुरक्षित ताब्यात असल्याची माहिती सरकारला असल्याचे शेखावत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या रत्नांचे आणि दागिन्यांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वारसा मूल्य मोठे आहे. तसेच हैदराबादमधील जनतेच्या भावना आणि या दागिन्यांचे त्यांच्या मूळ शहरात प्रदर्शन व्हावे, ही मागणी सांस्कृतिक मंत्रालयाने मान्य केली आहे. मात्र, सध्या हे दागिने आरबीआयसोबतच्या विद्यमान सुरक्षा, विमा आणि जतन करारांतर्गत उच्च-सुरक्षा कोठडीत ठेवण्यात आले आहेत.

हे दागिने सार्वजनिक प्रदर्शनासाठी हैदराबादला नेण्याबाबत लोकांची दीर्घकालीन भावना असली तरी, तांत्रिक आणि सुरक्षेच्या कारणांमुळे त्यांच्या हस्तांतरणाचा कोणताही ठोस निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे हे मौल्यवान दागिने सध्यातरी आरबीआयच्या तिजोरीतच सुरक्षित राहतील हे स्पष्ट झाले आहे.