
मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, खान्देशात 17 ते 20 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 18 ते 20 मार्च दरम्यान पावसाची तीव्रता वाढणार असून यावेळी गारपीटही होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. एकीकडे रब्बी पिकांची कापणी सुरू असताना पावसाचा इशारा देण्यात आल्याने बळीराजाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
”राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. १८ ते २० मार्चदरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे”, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
तसेच रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.























































