वडखळ-अलिबाग मार्गावरील खड्डे बुजवण्यात 22 कोटींचा गैरव्यवहार, सुनील प्रभू यांची चौकशीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ ते अलिबाग या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामात 22 कोटी 14 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. सरकारी अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांनी संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार केला आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना केली.

या रस्त्याचे काम देवकर अर्थ मुव्हर्स या कंपनीला देण्यात आले होते. या कंत्राटदाराने रस्त्यांचे अत्यंत निकृष्ट काम केल्याने खड्डे बुजवण्यासाठी सरकारने 22 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. पण यामध्ये घोटाळा झाला आहे. या मार्गावर कंत्राटदाराने निकृष्ट काम केले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर असंख्य खड्डे पडले. त्यामुळे नागरिक आणि वाहन चालकांची प्रचंड गैरसोय झाली. दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट होते. त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवण्यात येतो. सुमारे 1 हजार 700 कोटी रुपये खर्च करून वडखळ ते अलिबाग या पंचवीस किमी लांबीच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याचे आश्वासन सरकारने दिल होते. पण त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. या प्रकरणी शासनाने चौकशी करून या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुनील प्रभू यांनी केली.

चित्रपटातील कंत्राटी कामगारांवर अन्याय

दादासाहेब फाळके चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व इतर करमणूक क्षेत्रातील कंत्राटी कामगार, ज्युनिअर आर्टिस्टची संख्या सुमारे पाच लाख आहे. त्यांच्यावर मालक-निर्मात्यांकडून अन्याय होत असल्याचे सुनील प्रभू यांनी सांगितले. या कामगारांची कामाची वेळ सकाळी आठ ते बारा निश्चित करा, दुपारी एक वाजता जेवणाची वेळ निश्चित करा, कामाचे वेतन कंत्राटदारांऐवजी थेट निर्मात्यांकडून द्यावे, चित्रीकरणास रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.