
उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या प्रवाशांना मध्य रेल्वेने दिलासा दिला आहे. मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. एप्रिल अखेरपर्यंत एसी लोकलच्या दैनंदिन फेऱ्या शंभरी पार करणार आहेत. यामुळे प्रवाशांना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळणार असून लोकल प्रवास सुखद होणार आहे.
सध्या मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या 94 फेऱ्या चालवल्या जात आहेत. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे तयार झालेली नवीन रेल्वे गाडी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. ही नवीन गाडी आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान 12 ते 14 नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू करण्यात येतील.
मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाऱ्याने उच्चांकी पातळी गाठली होती. उन्हाचा कडाका वाढल्याने बाहेर पडणेही मुश्किल झाले होते. अशातच गरमीमध्ये लोकलमधून प्रवास करणे नोकरदारांना त्रासदायक ठरत आहे. यामुळे प्रवासी लोकलला प्राधान्य देत आहेत. सध्या मध्य रेल्वेकडे सात एसी लोकल असून त्या मुख्य आणि हार्बर मार्गावर धावतात. वाढता उकाडा पाहता या नवीन फेऱ्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

























































