
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यात सोलापूरच्या विजय लामकाने राज्यात पहिला आला आहे. तर सोलापूरमधीलच आरती जाधव ही महिलांमधून राज्यात पहिली आली आहे.
एमपीएससीकडून 27 ते 29 मे 2025 या कालावधी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. यानुसार विविध 20 संवर्गातील एकूण 461 पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे. एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल रखडल्याने उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या होत्या. मात्र आता निकाल जाहीर झाल्याने यशस्वी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
‘त्या’ उमेदवारांचा निकालात समावेश नाही
वैद्यकीय तपासणीस अनुपस्थित असलेले विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी अपूर्ण असल्याने या उमेदवारांच्या निकालाचा समावेश या निकालात करण्यात आला नाही. शिवाय जाहीर करण्यात आलेला निकाल हा समांतर आरक्षण आणि अन्य मुद्दय़ांसंदर्भात न्यायालयात असलेल्या प्रकरणांच्या अधीन राहून जाहीर करण्यात आल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.
























































