
चालक केवळ मद्यधुंद अवस्थेत आहे या कारणावरून पोलीस गाडी ताब्यात घेऊ शकत किंवा जप्त करू शकत नाहीत, असा महत्वपूर्ण निर्वाळा तेलंगणा उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती ई.व्ही वेणुगोपाल यांनी एका प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्णय दिला. या निर्णयामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
चालक मद्यधुंद अवस्थेत असेल तर त्याला गाडी चालवण्यापासून रोखू शकता, पण वाहन जप्त करू शकत नाही. अशा स्थितीत चालकाच्या जवळच्या नातेवाईक किंवा मित्राला गाडी ताब्यात घेण्यास बोलवावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. जर कोणताही पर्याय नसेल तर वाहन सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मालकाच्या स्वाधीन करावे असे न्यायालयाने पुढे नमूद केले.
ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांमध्ये पोलीस सरसकट गाड्या जप्त करतात. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. रस्ते सुरक्षा महत्त्वाची असली तरी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणतीही कारवाई करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.


























































