
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेनेदेखील जय्यत तयारी सुरू केली असून 2017 च्या धर्तीवर प्रभाग रचनेची आखणी करण्याचे काम हाती घेतले आहे. ठाणे महापालिकेत आता चार वॉर्डचा एक प्रभाग होणार आहे. प्रत्येक वॉर्डमधील मतदारांची संख्या, नागरी सुविधा यांसह विविध घटक तपासले जात असून प्रशासकीय कामकाज व नागरिकांची कामे जलदगतीने व्हावीत याचाही अभ्यास वॉर्ड रचना करताना केला जात आहे.
महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने मंगळवारी दिले आहेत. नगरविकास विभागाने अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश दिल्यानंतर ठाणे महापालिका कामाला लागली आहे. ठाणे पालिकेत पूर्वीप्रमाणेच चार नगरसेवकांचा एक प्रभाग होणार असून २०११ च्या जनगणनेप्रमाणे महापालिका निवडणूक होणार आहे. चार वॉर्डचा एक प्रभाग होणार असल्याने ठाण्यातील राजकीय पक्षांनीदेखील आपली मोर्चेबांधणी त्यादृष्टीने सुरू केली आहे.
सत्ताधाऱ्यांनी मनाप्रमाणे प्रभाग रचना केली होती
खाडीच्या पलीकडे आणि अलीकडे ठाणे शहर विभागले गेले आहे. किंबहुना ठाण्याच्या या दोन अविभाज्य बाजू आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूकडील लोकसंख्येचा विचार करून प्रभागांची रचना तथा विभागणी झाली पाहिजे, असा आग्रह काही राजकीय पक्षांनी घेतला आहे. प्रशासनाने पूर्वी आपल्या मनाप्रमाणे प्रभाग रचना केली होती. प्रभागांची संख्या ठाणे शहरात अधिक दाखवली होती. खाडीच्या पलीकडे म्हणजेच कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ या परिसरात प्रभागांची संख्या कमी दाखवल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला होता.
जुनी पद्धतच अवलंबणार गेल्या दहा वर्षांत झालेली लोकसंख्या वाढ लक्षात घेता नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. त्यामुळे ठाणे महापालिकेत ११ नगरसेवक वाढणार होते. विशेष म्हणजे तीन नगरसेवकांचा एक प्रभाग करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र सध्याच्या ट्रिपल इंजिन सरकारने महापालिका निवडणुका जुन्या पद्धतीने घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
कार्यपद्धतीवर लक्ष ठेवा
प्रभाग निर्मितीसाठी हद्द किंवा फेररचना करण्यात येणार आहे. ही हद्द ठरवताना आयुक्तांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना राजकीय नेते आपल्या घरी किंवा कार्यालयात बसवून प्रभाग रचना करतात. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतंत्र यंत्रणेमार्फत या प्रभाग रचना कार्यपद्धतीवर लक्ष ठेवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.