राज्यात पर्यावरणाची ऐशीची तैशी, आदित्य ठाकरे यांनी यादीच मांडली

एकीककडे राज्यात पर्यावरणाची हानी होत आहे आणि सरकार पर्यावरणाबाबत किती जागरूक आहे हे दाखवण्यात मश्गूल आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच राज्यात पर्यावरणाची हानी कशी होत आहे याची यादीच आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, आज जागतिक पर्यावरण दिन आहे. हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपल्याला सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अनेक आमंत्रणही आली असतील. पण आज जे पर्यावरणसंबंधित जी संकट आपल्यासमोर उभी ठाकली आहेत, त्याबाबात सरकारला प्रश्न विचारण्याची कुणामध्ये हिंमत आहे का? पर्यावरण दिनानिमित्त सरकारकडून फक्त इव्हेंट होतात आणि हा फक्त भपका असतो.

मुंबईसाठी तयार करण्यात आलेला क्लायमेट अॅक्शन प्लॅन जवळपास केराच्या टोपलीत टाकण्यात आला आहे.
ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यानात खाणकामाला परवानगी देण्यात आली आहे.
लोखंडवाला तलाव अजूनही पाणथळ जागात समाविष्ट करण्यात आलेला नाही आणि दुसरीकडे मुंबईतल्या झाडांची कत्तल होत आहे.
धारावी पुर्नविकास प्रकल्पात माहीम नैसर्गिक उद्यानाचा समावेश करण्यात आला आहे. वेताळ टेकडी प्रकल्प अद्याप रद्द करण्यात आलेला नाही. अजनी वनावर अजूनही सरकारी बुलडोझरची टांगती तलवार कायम आहे. नदी विकास नावाने पुण्यातील पूरपरिस्थिती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरण बांधण्यासाठी तानसा वन्यप्राणी अभयारण्यातील पाच लाख झाडांच्या कत्तली होणार आहे.
उत्तर मुंबईत बनवण्यात येणाऱ्या पुलासाठी 9 हजार खारफुटींची झाडं तोडण्यात येणार आहेत तर याचा फटका 60 हजार खारफुटींच्या झाडांना बसणार आहे.
पर्यावरण बचावासाठी माझी वसुंधरा योजना मागे पडली आहे.
आणि हे सगळं सुरू असताना आपण पर्यावरणाबाबतीत किती जागरूक आहोत हे दाखवण्यात सरकार मश्गूल आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.