कमतरता नाही तर, लोक गॅस सिलिंडरसाठी रांगा का लावत आहेत? आपचा केंद्र सरकारला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात सध्या जाणवत असलेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईवरून आम आदमी पार्टीने (AAP) केंद्र आणि दिल्ली सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीसह संपूर्ण देशात जर एलपीजीची कमतरता नाही, तर मग गॅस एजन्सींसमोर सिलिंडरसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा का लागत आहेत, असा सवाल आपने उपस्थित केला आहे.

आम आदमी पार्टीने याप्रकरणी मोदी सरकारला समोर येऊन जनतेला खरे काय ते सांगण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून असा दावा केला जात आहे की, हिंदुस्थानी जहाजांसाठी होर्मुझ हा सागरी मार्ग खुला आहे आणि देशात एलपीजीचे उत्पादनही वाढवण्यात आले आहे. मग असे असतानाही ही टंचाई का निर्माण झाली आहे, असा प्रश्न आपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज X वर एक पोस्ट करत विचारला आहे.

सौरभ भारद्वाज यांनी केंद्राच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशात एलपीजीची ही कमतरता नेमकी कशामुळे आहे आणि गॅसचा काळाबाजार का होत आहे, याचे स्पष्टीकरण त्यांनी मागितले आहे. तसेच एलपीजीच्या या टंचाईमुळे त्रस्त झालेले प्रवासी मजूर दिल्ली सोडून का जात आहेत, असा सवालही भारद्वाज यांनी उपस्थित केला आहे.