मिंधे गटाने केला अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा, अडसूळ विरूद्ध राणा संघर्षाला सुरुवात

अजित पवार गटाच्या सरकारमधील समावेशामुळे मिंधे गटात जबरदस्त अस्वस्थता पसरली आहे. मिंधे गट आणि भाजप तसेच भाजपचे मित्र पक्ष यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली असून त्याची आणखी एक झलक अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे.

नवनीत राणा ज्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत त्या मतदारसंघावर अभिजीत अडसूळ यांनी दावा ठोकला आहे. आगामी लोकसभा निवडणूक आपण स्वत: किंवा आपले वडील आनंदराव अडसूळ हे या मतदारसंघातून लढणार असल्याचे अभिजीत यांनी जाहीर करून टाकले आहे.

अभिजीत अडसूळ यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघ ही आमची हक्काची जागा असल्याचे म्हटले आहे. राज्यातील समीकरण बदलले असले तर या जागेवर त्याचा परिणाम होणार नाही असे त्यांनी परस्पर जाहीर करून टाकले.

याबाबत नवनीत राणांचे पती आणि आमदार रवी राणा यांना विचारलं असता ते म्हणाले की या मतदारसंघातून नवनीत राणा यांच्या व्यतिरिक्त कोणीही निवडणूक लढवणार नाही. कोणी कितीही म्हटलं तरी ही काळ्या दगडावरची रेघ आहे की अभिजीत अडसूळ, आनंदराव अडसूळ हे नवनीत राणांचा प्रचार करतील, असे राणा यांनी म्हटले.

कमळीचे दादांसोबत डील, मिंधे ढील!

मिंधे सरकारचे बहुचर्चित खातेवाटप अखेर शुक्रवारी पार पडले. या खातेवाटपात ‘दादा’गिरीच दिसून आली. अजित पवारांची ‘कमळी’बरोबर झालेली डील यशस्वी झाली आणि मिंधे ढील पडले. मिंधे गटाचा विरोध झुगारून भाजपाने राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांच्या हाती दिल्या. ईडीच्या रडारवर असलेल्या मुश्रीफ, मुंडेंना महत्त्वाच्या खात्यांची लॉटरी लागली. दुसरीकडे मिंधे गटातील वादग्रस्त मंत्र्यांना त्यांची खाती गमवावी लागली. कृषी खाते काढून अब्दुल सत्तारांचे पंख छाटले गेले, तर अन्न व औषध प्रशासन खाते जाऊन संजय राठोड यांच्या हाती माती पडली. दादा भुसेंचाही भुसा झाला, त्यांनी बंदरे गमावली.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या गटाने भाजपशी संधान साधल्यानंतर त्यातील 9 जणांचा मंत्रिपदाचा शपथविधी झाला होता. परंतु त्यांना खातेवाटप झाले नव्हते. खातेवाटपाचा तिढा गेले अनेक दिवस सुटत नव्हता. अजित पवार गटाला महत्त्वाची खाती देऊ नयेत यासाठी मिंधे गट हट्टाला पेटला होता. अजित पवारांना अर्थ खाते देण्यास तर त्यांनी जाहीर विरोध केला होता. त्यानंतर दिल्ली दरबारी खलबते झाली. अखेर आज खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचली आणि नव्या मंत्र्यांना खाती मिळाली.