IND Vs ENG – त्याला कसोटी संघात स्थान नाही…; श्रेयस अय्यरच्या पदरी पुन्हा निराशा; अजित आगरकरांनी सांगितलं कारण

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून इंग्लंडमध्येच पाच सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी BCCI ने शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. उपकर्णधारपदी ऋषभ पंतची वर्णी लागली असून साई सुदर्शन आणि अर्शदप सिंगची पहिल्यांदाच कसोटी संघात निवड झाली आहे. परंतु जबरदस्त फॉर्मात असलेल्या मुंबईच्या श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळू शकलेलं नाही.

श्रेयस अय्यरने रणजी करंडक आणि सय्यद मुश्ताक अली करंडकात आपल्या खेळाचा तडाखा दाखवून दिला होता. सय्यद मुश्ताक अली करंडकात मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडत संघाला विजेतेपद पटकावून दिले. आयपीएलमध्ये त्याने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली आणि पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करताना संघाला प्ले ऑफमध्ये घेऊन जाण्यात खारीचा वाटा उचलला. तसेच टीम इंडियाकडून खेळतानाही त्याचा खेळ दमदार राहिला आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची संघात निवड होईल, अशी चाहत्यांना आशा होती. परंतु त्याला संधी मिळालेली नाही.

…आणि त्याला एक संधी मिळाली! टीम इंडियामध्ये झालं पुनरागमन, आता धमाका करणार?

बीसीसीआय संघनिवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये श्रेयस अय्यरच्या निवडीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “हे खरं आहे की श्रेयस अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केलं आहे, परंतु सध्या कसोटी संघात त्याच्यासाठी कोणतीही जागा नाही”. श्रेयसने जानेवारी 2024 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले असून 36.86 च्या सरासरीने 811 धावा केल्या आहेत.