
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलएलबी-3’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये सुरू होते. यावरुन याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु या प्रकरणात आता कलाकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. असे म्हटले जात होते की, या चित्रपटाच्या माध्यमातून न्यायव्यवस्था आणि वकिलांची चुकीची प्रतिमा सादर करण्यात आली आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाने ही दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरण आणि प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. असे म्हटले जात होते की, चित्रपटातून न्यायव्यवस्था आणि वकिलांची चुकीची प्रतिमा सादर करण्यात आली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दोन भागात न्यायव्यवस्थेचेही चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आले होते असे याचिकेमध्ये म्हटले होते.
उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही आणि त्यातील कोणतेही दृश्य उघड झालेले नाही. अशा परिस्थितीत, केवळ भीतीच्या आधारे बंदीची मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने शूटिंग आणि रिलीजवर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे. रिलीज झाल्यानंतर, काही आक्षेपार्ह मजकूर आढळला तर सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार करता येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. अन्यथा न्यायालयात धाव घेता येईल. उच्च न्यायालयाने अजमेर जिल्हा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. अजमेर जिल्हा न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रभान राठोड यांनी हा खटला दाखल केला होता. राजस्थानमध्येही या चित्रपटाचे चित्रीकरण अनेक ठिकाणी झाले आहे.
जॉली एलएलबी 3 चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष कपूर करत आहेत. हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचे पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.