
स्वित्झर्लंडच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी साडेचौदा लाख कोटींचे गुंतवणूक करार केल्याचा मोठा गाजावाजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. हजारो कोस दूर दावोसला जाऊन फडणवीस यांनी करार मात्र मुंबई, महाराष्ट्रातील कंपन्यांबरोबर केले. त्यात लोढा डेव्हलपर्स, रहेजा, पंचशील आणि सुरजागड इस्पात या कंपन्यांचा समावेश आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अबंदास दानवे यांनी ट्विटरवर पोस्ट करत सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.
”स्वदेशी गुंतवणूक, विदेशी पॅकेजिंग आणि दावोसचं ‘फिक्सिंग’! अल्ट्रा कॅपिटल, पंचशील, लोढा, रहेजा, सुरजागड इसपात या कंपन्यांची मुख्यालयं पुणे, मुंबई, गडचिरोलीत! मग यांच्याशी करार करायला स्वित्झर्लंडला जाण्याचं प्रयोजन काय? असा सवाल त्यांनी या पोस्टमधून केला.
तसेच त्यांनी या पोस्टमधून आणखी काही प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारले आहेत. ते म्हणाले की, परकीय कंपन्यांचा आपल्यावर विश्वास बसत नाहीये का? की केवळ ‘आकड्यांची फुगेबाजी’ करण्यासाठी हा इव्हेंट मॅनेजमेंटचा फार्स रचला जातोय? स्वतःच्याच लोकांशी कागदांची देवाण-घेवाण करायला मुंबईचं ‘मंत्रालय’ कमी पडलं होतं का? ‘मेक इन इंडिया’चं रूपांतर ‘फेक इन दावोस’ मध्ये करणारी ही कोणती चाणक्यनीती? असे सवाल देखील केले आहे.
या पोस्टसोबत दानवे यांनी काही मुद्दे उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना टोले देखील लगावले. ”आपल्याच माणसांना विमानात बसवून न्यायचं, तिथे स्वतःच्याच लोकांशी हस्तांदोलन करायचं आणि देशी गुंतवणुकीला FDI चा खोटा मुलामा चढवायचा. जनतेच्या डोळ्यांत करत असलेली ही धूळफेक बंद करा! असे देखील त्यांना सत्ताधाऱ्यांना सुनावले.
सुरजागड इस्पात – स्टील क्षेत्रातील या कंपनीबरोबर 20 हजार कोटींचा गुंतवणूक करार केला गेला. फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिह्यातील आहेरी तालुक्यात वडलापेठ येथे या कंपनीचे मुख्यालय आहे. आठ हजार रोजगार निर्मिती या गुंतवणुकीतून होईल असा फडणवीसांचा दावा आहे.
लोढा डेव्हलपर्स – राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक लोढा यांच्या लोढा डेव्हलपर्स कंपनीबरोबर फडणवीस यांनी एक लाख कोटींचा करार केला. आयटी आणि डेटा सेंटर्स क्षेत्रासाठी हा करार केला गेला आहे. त्यातून दीड लाख रोजगार निर्मिती होईल असेही सांगितले गेले. या कंपनीचे कार्यालय मंत्रालयापासून 2.6 किलोमीटरवर फोर्टच्या हॉर्निमन सर्कल येथील वर्धमान चेंबरमध्ये आहे. मंत्रालयातून तिथे पोहोचण्यास अवघी 11 मिनिटे लागतात.
के. रहेजा – या कंपनीबरोबर फडणवीस यांनी सुमारे 10 बिलियन डॉलर्सचा करार केला. त्यातून एक लाख रोजगार निर्मितीचा दावा आहे. या कंपनीचे मुख्यालय मुंबईतील खारमध्ये आहे. मंत्रालयापासून 21.1 किलोमीटरवरील या कार्यालयात पोहोचण्यास कारला 37 मिनिटे लागतात.
अल्टा कॅपिटल/पंचशील – रिअॅल्टी क्षेत्रातील या कंपनीबरोबर फडणवीस यांनी 25 बिलियन डॉलर्सचा करार केला. त्यातून अडीच लाख रोजगार मिळतील असा अंदाज आहे. या कंपनीचे कार्यालय मंत्रालयापासून चालतही जाता येईल अशा एक किलोमीटर अंतरावरील एक्स्प्रेस टॉवरच्या 20 व्या मजल्यावर आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही करारासाठी मंत्रालयात बोलवता आले असते.




























































