लेख – पाऊले चालती पंढरीची वाट…

>> दिलीप देशपांडे , [email protected]

वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. पंढरी नगरीचा स्पर्श, चंद्रभागेत स्नान आणि विठोबाचे-पांडुरंगाचे दर्शन या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढीवारी ही प्रत्येक वारकरी महिला-पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे. प्रत्येक भक्ताला, वारकऱ्याला आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन होणारच. कारण तो प्रत्येकाच्या मनामनात आहे.

वारी म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीचा लळा
वारी म्हणजे वैष्णव भक्तांचा मेळा
वारी म्हणजे आनंदाचा सोहळा

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा ही बरीच जुनी आहे. 13 व्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. ज्ञानदेवांच्या काळात त्यांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात होते, असा उल्लेख आढळतो.

वारकरी संप्रदायात लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, पुरुष-महिला हा भेदाभेद नाही. एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात, नमस्कार करतात. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. पंढरी नगरीचा स्पर्श, चंद्रभागेत स्नान आणि विठोबाचे-पांडुरंगाचे दर्शन या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढीवारी ही प्रत्येक वारकरी महिला-पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे. त्यांचे मागणे एकच असते.

हेची दान देगा देवा,तुझा विसर न व्हावा…तुझा विसर न व्हावा

विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे/विठ्ठलाचे हे सारेच भक्त असतात. आपले कर्तव्यकर्म निष्ठsने करीत असताना ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. या माळेचा जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय ती गळ्यात घातल्याशिवाय वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो.

सात्त्विक आहार, सदाचारण करावे. परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे, असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने एक प्रकारची ऊर्जा मिळते. ती ऊर्जा, आनंद पुढील वारीपर्यंत वारकरी टिकवतो.

वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’, ‘पंढरीनाथ महाराज की जय!’ असा जयघोष केला जातो. स्थानपरत्वे या जयघोषात ‘पंढरीनाथ भगवान की जय’ असा वेगळेपणा आढळतो. वारीत अभंग, ओव्या, भारुड, हरिपाठ, ज्ञानेश्वरी हे सगळे येत. जो तो आपल्याच नादात असतो.

पंढरपूरला जात असलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरांतून स्वेच्छेने घेतली जाते. काही मंडळी वैयक्तिक किंवा काwटुंबिक स्तरावर अशी सेवा पुरवितात. ज्यामध्ये वारीच्या मार्गावर उभे राहून वारकऱ्यांना खाद्यपदार्थ पुरविणे, पाण्याची व्यवस्था, कपडे, रेनकोट देणे अशी सेवा केली जाते. सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था यासुद्धा वारकऱ्यांना विविध सुविधा पुरवितात. यामध्ये त्यांची सेवा करणे असा भाव असतो. काही वैद्यकीय संस्था आणि रुग्णालये वारकरी भक्तांच्या वैद्यकीय चाचणी, उपचार यांची काळजी घेतात.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, मुक्ताईनगरहून संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरला येते. सोपानदेवांची पालखी सासवड येथून येते. उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. हजारो दिंडय़ा पंढरपूरच्या वाटेने पांडुरंगाचा जयघोष करत मार्गस्थ असतात.

पंढरपुराला उत्तरेकडे तीन व दक्षिण आणि पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून ज्या 11 पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यातील एका पायरीला ‘नामदेवाची पायरी’ म्हणतात.

वारीदरम्यान होणारे ‘रिंगण’ हे वारीचे वैशिष्टय़ मानले जाते. कडूस फाटा, वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने ‘माऊलीचा अश्व’ असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे.

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे म्हणतात, ‘वारी हा भगवत भक्तीचा नुसता आविष्कार नसून भक्ती प्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे. परब्रह्माला साठवीत साठवीत विवेकाच्या दिशेने होणारी वाटचाल म्हणजे पंढरीची वारी. मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी. बहुतेक क्रियांमध्ये साधन खडतर असते तर साध्य आनंद रूप असते. वारीच्या वाटचालीत साधन आणि साध्य दोन्ही आनंद रूपच. ज्ञानरूप परमात्मा हे साध्य, तर भक्ती वाटचाल हे साधन आहे.’

प्रत्येक भक्ताला, वारकऱ्याला आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन होणारच. कारण तो प्रत्येकाच्या मनामनात आहे. यंदाही खूप मोठय़ा संख्येने वारकरी या आनंदवारीत सहभागी झालेले आहेत. वारकऱ्यांची पाऊले चालली आहेत पंढरीच्या वाटेने…