
>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक
शब्दगंध साहित्यिक परिषदेचे 16 वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. दर्दी रसिकांच्या गर्दीने मोहरलेले आणि रसिकांच्या मनात सृजनाचे बीज पेरणारे हे नियोजनबद्ध संमेलन रसिकांची अभिरुची वाढविणारे व मार्गदर्शक असे ठरले.
।। तीर्थामध्ये काशी व्रतांमध्ये एकादशी
भाषांमध्ये तशी मराठी शोभिवंत ।।
।। ऐसी मराठी सुंदरी ते संस्कृता शोधु करी
शटिक बैसवी हृदयमंदिरी अज्ञानाची ।।
कैवल्य साम्राज्य पावर्ती संत ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीच्या वेगळेपणाची वैशिष्टय़पूर्ण ओळख करून दिली, यादव काळात महानुभाव पंथाचे वाङ्मय आणि पुढे `ज्ञानेश्वरी’तून सगळ्या साहित्य संकल्पना जन्माला आल्या. असे असले तरी गेल्या सव्वाशे-दीडशे वर्षांपासून मराठी भाषेला अपेक्षित वैभव प्राप्त व्हावे म्हणून मराठी माणूस आस लावून बसला होता. संघटित प्रयत्नांतून अखेरीस मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि तिच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोर उमटली. या मराठी भाषेचा उत्सव साजरा करणारे साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे एक खास वैशिष्टय़ आहे. साहित्य रसिकांना ती पर्वणी असते. खास साहित्यिक मेजवानीच असते. मराठी भाषिक जगाच्या कानाकोपऱयात पोहोचले आहेत आणि त्यांचे मराठी साहित्यावरही अपार प्रेम आहे. `अमृतातेही पैजा जिंकणाऱया’ मराठी भाषेत विपुल साहित्य उपलब्ध आहे. हे साहित्य सर्व थरांतील रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम साहित्य संमेलन करते.
`शब्द हाच गंध, शब्द हीच रत्ने, जोडावे सृजन साहित्य प्रयत्ने’ हे बोधवाक्य घेऊन सुमारे 22 वर्षांपूर्वी अहिल्यानगर (तत्कालीन नगर) येथे साहित्यप्रेमींनी शब्दगंध साहित्यिक परिषदेची स्थापना केली. सुमारे 300 सभासद असलेल्या या संस्थेच्या दमदार वाटचालीचे महाराष्ट्रात सर्वत्र स्वागत झाले. आजवरच्या वाटचालीत यशस्वीपणे 15 संमेलने झाली. नुकतेच 8 व 9 फेब्रुवारी रोजी शब्दगंध साहित्य परिषद, अहिल्यानगर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 16 वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन पार पडले.
या संमेलनाच्या पूर्वसंध्येला काव्य संमेलनाने मोठी बहार आणली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्रा. डॉ. महावीरसिंग चव्हाण हे या काव्य संमेलनाचे अध्यक्ष होते. या वेळी अनेक नामवंत कवींनी आपल्या काव्यरचना सादर केल्या. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते 9 फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आमदार संग्रामभैया जगताप, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी संमेलनाध्यक्ष तथा माजी आमदार लहू कानडे, मावळते संमेलनाध्यक्ष तथा सेवानिवृत्त आयएएस अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर, माजी आमदार साहेबराव दरेकर, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. राजेश गायकवाड, भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलुलकर, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
संमेलनाध्यक्षा डॉ. संजीवनी तडेगावकर म्हणाल्या, “साहित्य आपल्या बुद्धीची लवचिकता वाढवते, आकलनाच्या कक्षा रुंदावते. आपली आत्मिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढीस लावते आणि आपल्याला मुळातून बदलून संवेदनशील बनवते. जे माणूसपणापासून दूर गेले आहेत त्यांना परत माणूस बनविण्याची अपार ताकद साहित्यात असते. साहित्याचे अनेक नवनवे प्रवाह आहेत. साहित्याच्या प्रयोजनामध्ये, जगण्याच्या प्रयोजनामध्ये आपण वेगळा विचार केला पाहिजे. मात्र व्रतस्थ पद्धतीने लिहिले जाणारे साहित्य चिरकाल टिकते आणि आनंद देते.” केवळ पुरस्कारासाठी लिहिले जाणारे साहित्य आजच्या समाज जीवनासाठी घातक आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
उद्घाटन सत्रात पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, “साहित्यामध्ये 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, त्याचबरोबर समाजमनाचे चित्रण असते. पूर्वीची माणसं साहित्य अक्षरश: जगायची. त्या त्या काळातील परिस्थितीनुसार साहित्य निर्माण होते. पर्यावरणाचा ऱहास होत आहे. तापमान बदलावर जर नवे साहित्य जन्माला आले नाही तर पृथ्वीतलावरून माणूस नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी मानवी जीवनाचे साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे. `शब्दगंध’चे हे संमेलन नगरकरांना निश्चितच नवीन प्रेरणा देईल.”
आमदार संग्रामभैया जगताप म्हणाले, “साहित्य हे राज्याचं आणि देशाचं भविष्य ठरवू शकते. त्याचबरोबर ते माणसाला दिशा देण्याचे काम करते. साहित्यातील विचार आपल्या मनावर कोरले जातात. पुढची पिढी घडविण्यासाठी आजच्या डिजिटल युगातही वाचन संस्कृती टिकून राहणे गरजेचे आहे.” नगर शहरातील सामाजिक न्याय भवन परिसरात लवकरच एक दर्जेदार सुसज्ज ग्रंथालय व अत्याधुनिक भव्य सभागृहाची उभारणी करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर म्हणाले की, “भविष्यात आपण वाचाल तर वाचाल. साहित्य माणसाच्या मनाची मशागत करते. भरणपोषण करते, संस्कार शिकविते. त्याचबरोबर जगण्याची दिशा देते.” शब्दगंध साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले, “साहित्यिक संत असतो आणि संत साहित्यिक असतात. शेतकरी, दीनदलित, दुबळ्यांचे प्रश्न साहित्यातून दिसून येतात. साहित्यातून जातीभेद, लिंगभेद दूर करणारे विचार यायला हवेत.” या वेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. प्राचार्य चंद्रकांत भोसले व माजी आमदार साहेबराव दरेकर यांना `शब्दगंध जीवन गौरव’, तर रत्ना कांबळे यांना `मातोश्री यमुनाबाई पांडुळे स्मृती पुरस्कार’, प्रा. डॉ. शंकरराव चव्हाण यांना `प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे स्मृती पुरस्कार’, किशोर डोंगरे यांना `के. डी. सातपुते स्मृती पुरस्कार’ देण्यात आला.
साहित्य संमेलनाच्या प्रारंभी पारिजात चौक ते कोहिनूर मंगल कार्यालय लोकसाहित्य जागर यात्रा काढण्यात आली. त्यात दिगंबर गोंधळी व त्यांच्या सहकाऱयांनी बहारदार संबळ वादन केले, तर शालेय विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर केले. संमेलनाच्या पहिल्या सत्रात शाहीर भारत गाडेकर व दिगंबर गोंधळी यांनी शाहीर वामन कर्डक यांच्या प्रबोधनात्मक गीतांनी धमाल उडवून दिली. दुसऱया सत्रात उद्घाटन समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संमेलनाच्या तिसऱया सत्रात मुलांचे सादरीकरण पार पडले, तर चौथ्या सत्रात प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन पार पडले. अनेक नवोदित कवी, कवयित्रींनी आपल्या आशयघन रचना सादर करून सद्यस्थितीवर भाष्य केले.
संमेलनातील पाचव्या सत्रात `अभिजात मराठी भाषा : साहित्यिकांची जबाबदारी’ या परिसंवादात नगर महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांनी अध्यक्षपद भूषविले. ते म्हणाले, “भाषा माणसांचा विकास करत असते, ज्ञानभाषा ही माणसाला ज्ञानवंत व आर्थिक सुबत्ताधारक बनवत असते म्हणून ती महत्त्वाची असते. त्यामुळे सर्वांनीच आपली अभिजात मराठी टिकण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.” या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. संदीप सांगळेदेखील उपस्थित होते. प्रसिद्ध साहित्यिक डॉ संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली सहाव्या सत्रात विनय मिरासे यांनी कथाकथन सादर केले. दुपारच्या सातव्या सत्रात अभय आव्हाड यांच्या हस्ते राज्यस्तरीय कथा, कविता, निबंध लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. त्यानंतरच्या आठव्या सत्रात मराठी, हिंदी, उर्दू गझल संमेलन पार पडले. अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय गझलकार डॉ. कमर सुरूर होत्या. हुमायून अत्तार, जयश्री सोनार, संदीप राठोड, रतन पिंगट, बिलाल अहमदनगरी, असिफ अहमद, संदीप ढाकणे आदींनी बहारदार गझला सादर केल्या.
सर्वसामान्य माणूस उदात्त हेतूने, समर्पित विचारांनी संघटित झाल्यावर एखादं मोठं कार्य लीलया पार पाडू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे शब्दगंध साहित्यिक परिषद होय. दर्दी रसिकांच्या गर्दीने मोहरलेले आणि रसिकांच्या मनात सृजनाचे बीज पेरणारे नियोजनबद्ध संमेलनाचे हे दोन्ही दिवस स्मृतीच्या हिंदोळ्यावर कायम आनंदाचे डौलदार झोके देतील यात संदेह नाही.
ह महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. राजेश गायकवाड म्हणाले, “शब्दगंध साहित्य संमेलनाकरिता यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने दोन लाखांचा निधी दिला आहे. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने येणाऱया काळात शब्दगंध साहित्य संमेलनाला पाच लाखांचा निधी देऊ. दोन लाख राज्य शासनाचे आणि तीन लाख केंद्र शासनाचे असा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नवलेखकांसाठी खास योजना आखण्यात आली असून नवलेखकाचे पहिले पुस्तक मोफत प्रकाशित करून देण्यात येणार आहे. चरित्र ग्रंथ लिहिणाऱयांना अनुदानही दिले जाईल.’
(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)