मुद्दा – अर्थव्यवस्थेच्या वेगात हरवलेली माणसं

>> मच्छिंद्र ऐनापुरे

भारतीय अर्थव्यवस्थेची झपाटय़ाने होत असलेली प्रगती जगाला चकित करते. आर्थिक आकडेवारी आणि विकास दर यांची वाच्यता सत्ताधीशांसाठी गौरवाचा विषय ठरते, परंतु या झगमगत्या आकडय़ांच्या आड लपलेली एक कडू सत्यता दुर्लक्षित करता येणार नाही, ती म्हणजे देशातील कोटय़वधी सामान्य कुटुंबांची हालअपेष्टांनी भरलेली जीवन कहाणी.

या कुटुंबांपैकी काहींची स्वप्ने मोठी असतात. त्यांना वाटते, कर्ज काढू, व्यवसाय सुरू करू, कष्ट करू आणि एक दिवस उज्ज्वल भविष्य आपलं होईल, परंतु स्वप्नांची गाठ अनेकदा वास्तवाच्या काटेरी कुंपणाशी लागते. बाजारात स्पर्धा वाढते, महागाई गगनाला भिडते आणि त्याच वेळी उत्पन्न मात्र खालावते. अशा स्थितीत कर्ज फेडणे तर दूरच, रोजचं जगणंही दुर्गम वाटू लागतं. काहींना वाटते की, भविष्याचं विचार करून काय उपयोग? वर्तमान जगू या, पण तेही सहज शक्य नसतं. कारण आरोग्याची आणि शिक्षणाची किंमत दिवसेंदिवस वाढते आहे. खासगी शाळा, रुग्णालये, विमा, औषधे या सर्व गोष्टी आता श्रीमंतांच्या आवाक्यात आहेत, सामान्यांच्या नव्हे, आणि म्हणूनच थकलेल्या कर्जाचे ओझे, वाढत्या गरजा आणि अर्धवट राहिलेली स्वप्नं घेऊन कित्येक कुटुंबं उदास आणि निरुपाय होऊन बसलेली आहेत.

सार्वजनिक चिंता निर्माण करणारी घटना नुकतीच हरयाणातील पंचकुला येथे घडली. एका संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. त्यांच्यावर बँकेचे मोठे कर्ज होते. इतके की, ते फेडण्याची शक्यता त्यांच्या जीवनाच्या हद्दीबाहेर गेली होती. दिवसेंदिवसचे खर्च, मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि कर्जाचे हप्ते ही गणिते जेव्हा जुळेनाशी होतात तेव्हा माणूस फारच एकटा पडतो. अशा वेळी काही जण स्वतःशी संघर्ष करत राहतात. काही जण मूक वेदना सहन करतात, तर काही जण मृत्यूला कवटाळतात.

कर्ज ही संकल्पना आपण फार वेळा घर खरेदी, वाहन खरेदी किंवा व्यवसायासाठी वापरतो आणि हे साहजिकच आहे. कारण आर्थिक स्वावलंबनासाठी गुंतवणूक आवश्यक असते, पण जर व्यवसायासाठी घेतलेले कर्जही परतफेडीपलीकडे जाऊ लागले तर प्रश्न उभा राहतो – देश प्रगती करतो आहे खरा, पण या प्रगतीच्या वावटळीत हे लहान व्यावसायिक, शेतकरी आणि कामगार हरवत चाललेत का? कारण शेतकरी असो किंवा लघुउद्योगी – जर त्याच्या उत्पादनाचा खर्च भरूनही येत नसेल तर दोष फक्त त्याच्या मेहनतीचा नाही. त्यामागे बाजार व्यवस्थेतील असमतोल, नीती धोरणांतील त्रुटी आणि मधल्या दलालांचं वाढत चाललेलं वर्चस्व हे सगळं आहे. शेतीच्या खर्चावर अनुदान कमी होतंय आणि बाजारात हमीभाव मिळत नाही. अशा स्थितीत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आता केवळ आकडे राहिले आहेत, व्यथा नाही.

त्यातच लघुउद्योजक, हातावर पोट असलेले कष्टकरी, कॅब ड्रायव्हर, चहा विक्रेते हे सगळे संघर्ष करत आहेत. महागाई वाढत असताना त्यांचं उत्पन्न स्थिर राहिलं आहे आणि बँकेचे हप्ते मात्र पगारे चढतच आहेत. या पार्श्वभूमीवर आज सरकार पातळीवर केवळ कर्जमाफी हा उपाय असू शकत नाही. गरज आहे ती दृढ धोरणांची, दूरदृष्टीची आणि संवेदनशीलतेची. केवळ आकडय़ांची जंत्री वाढवून विकास घडत नाही. विकास तोच, जो शेवटच्या माणसाच्या दारापर्यंत पोहोचतो.

ही वेळ आहे प्रश्न विचारण्याची. व्यवसाय करतानाही तोटय़ात का जातोय? शेती ही तोटय़ाचा व्यवहार का ठरते आहे? आर्थिक विकासाचा लाभ खरोखर सर्वपरी पोहोचतो आहे का? ही वेळ आहे जबाबदारीने उत्तरं शोधण्याची. कारण लाखो स्वप्नं आणि जगणं हे त्या उत्तरांवर अवलंबून आहे. देशाच्या कोटय़वधी नागरिकांच्या डोळ्यांतील आशेचा दिवा फक्त आकडय़ांनी पेटत नाही. तो पेटतो वास्तवाशी प्रामाणिकपणे जोडलेल्या नीतींनी, सहानुभूतीने आणि कृतीने.