
>> प्रज्ञा कुलकर्णी
असे म्हणतात की, काही व्यक्ती या इतक्या गर्भश्रीमंत असतात की, जन्मतःच सोन्याचा चमचा आपल्या तोंडात घेऊन येतात, परंतु काही दुर्मिळ व्यक्ती इतक्या भाग्यवान असतात की, देवी सरस्वतीचा वरदहस्त आणि सद्गुरूंची कृपा घेऊनच जन्माला येतात. अशी ही गर्भश्रीमंती अनोखी असते. अखंड अक्षरसेवेसाठी लेखणी हातात घेऊनच ती माणसं जन्माला आलेली असतात. अशा भाग्यवान व्यक्तींपैकीच एक म्हणजे वामन देशपांडे!
देशपांडे काका हे संतसाहित्याचे निस्सीम उपासक तर होतेच, परंतु त्यांचे अभिजात, शाश्वत मराठी कवितेवरही निस्सीम प्रेम होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर हे त्यांचे प्राणविश्व होते. अत्यंत कलासक्त आणि प्रतिभावंत असे देशपांडे काका म्हणजे एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. चित्रकला, शिल्पकला, नृत्य हे विषयसुद्धा त्यांच्या अफाट अभ्यासाचे विषय होते. ते स्वतः एक उत्तम व्यंगचित्रकारही होते. त्यांनी काढलेली व्यंगचित्रे अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेली आहेत. भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भगवद्गीता, दासबोध या विषयांवर त्यांची असंख्य प्रवचने आणि भागवत सप्ताह झाले. संतचरित्रे, कथा, कादंबरी, नाटके, लहान मुलांसाठी अंकलिपी, प्रेरणादायी कथा, श्लोक, स्तोत्रे अशा विविध विषयांवरची त्यांची सव्वाशेच्या वर पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अगणित प्रस्तावना, परीक्षणे त्यांनी लिहिली. देशपांडे काकांचे हे शब्दभारले जीवन कसे होते हे सांगायचे झाले तर संत तुकाराम यांच्या या अभंगातूनच सांगता येईल..
आम्हा घरी धन। शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रs ।
यत्न करू। शब्दचि आमुच्या।
जीवाचे जीवन। शब्द वाटू धन।
जनलोका।
साहित्य विश्वातील अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा लेखक, कवी, संपादक व्यक्तींचा सहवास काकांना लाभला. कै. बाबामहाराज सातारकर, व.पु. काळे, अरविंद गोखले यांसारख्या दिग्गज लेखकांच्या ग्रंथांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत. देशपांडे काकांचे स्वतःचेही वाल्मीक प्रकाशन होते. त्यांनी या प्रकाशनातर्फे अनेक पुस्तके प्रकाशित केली आणि त्यातल्या काही पुस्तकांना तर पारितोषिकेही मिळाली. काकांना स्वतःला तर अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. त्यामध्ये प्र.के.अत्रे यांच्या नावाने मिळालेला सर्वोत्तम पुरस्कार आहे.
आपला हा सारा लेखन प्रवास काकांनी आपल्या ‘आणि ग्रंथोपजीविये’ या आत्मचरित्रपर ग्रंथातून मांडला आहे. शालेय जीवनातच त्यांना वाचन, लेखनाचा छंद लागला. त्यांचे शालेय शिक्षण गिरगावात झाले. त्यांनी रिझर्व्ह बँकेत एकेचाळीस वर्षे नोकरी केली. मराठी आणि सौंदर्यशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. केले. के.सी.कॉलेज ऑफ मॅनेजमेंट येथे वृत्तपत्रविद्या या विषयाचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’,‘सामना’,‘लोकमत’,‘तरुण भारत’ अशा वृत्तपत्रांतून त्यांनी अफाट सदर लेखन केले. अनेक दिवाळी अंकांचे संपादन करून त्यातही लेखन केले. दै. ‘सामना’शी त्यांचा विशेष जिव्हाळा होता. ‘सामना’मध्ये अध्यात्म आणि संतसाहित्याचे निरुपण अशी त्यांची वेगवेगळी सदरे प्रसिद्ध झाली.
देशपांडे काकांचे सद्गुरू मंत्रालयम येथील संजीवन समाधिस्थ श्री राघवेंद्रस्वामी. काका नेहमीच म्हणत की, राघवेंद्रस्वामींनी त्यांचा भक्तिमार्ग उजळवून टाकला. स्वतःला ते स्वामींचे अनुग्रहित राघवदास म्हणवून घेत. भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग यांची अनोखी सांगड काकांनी आपल्या जीवनात घातली होती. भगवद्गीतेत सांगितलेला निष्काम कर्मयोग हा काकांच्या सुखी, समाधानी आणि आनंदी जीवनाचा मंत्र होता.
देशपांडे काकांचा अवघा जन्मच मुळी केवळ शाश्वत, स्वयंप्रकाशी शब्दांची मनःपूर्वक पूजा करण्यासाठीच झाला होता. ते कार्य त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत केले.