
>> भगवान हारूगडे
संजय राऊत यांचे बहुचर्चित पुस्तक `नरकातला स्वर्ग’ 17 मे रोजी प्रकाशित होत आहे. हे पुस्तक म्हणजे तुरंग या नरकातील भयंकर अनुभव आहेत. राऊत यांची अटक व सुटका हा एक राजकीय सूडाचा प्रवास आहे. वाचक ज्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत असे एक पुस्तक बऱ्याच काळानंतर प्रकाशित होत आहे. पुस्तकाच्या निर्मितीचा हा थरारक प्रवास `सामना’तील संजय राऊत यांचे सहकारी भगवान हारुगडे यांनी जसाच्या तसा चितारला आहे…
एका उत्सुकतेपोटीच त्या दिवशी सेशन कोर्टात जाण्याचा मोह झाला आणि मला `नरकातला स्वर्ग’चा हिस्सा बनता आलं. आर्थर रोड जेलच्या कोठडीतून सुरू झालेल्या या पुस्तकाच्या प्रवासातील प्रवासी होणं… एका सूडाच्या राजकारणाच्या दस्तावेजाचा पहिला वाचक होणं माझ्यासाठी भूषणावह आहे.
”बरं झालं भगवान, तू आलास. मी तुला निरोप पाठवणारच होतो…”
सेशन कोर्टाच्या आवारात पोलिसांच्या गाडीतून उतरताच मला पाहून राऊत साहेब म्हणाले तसा मी चार पावले पुढे झालो आणि त्यांच्या जवळून चालू लागलो. अटकेत असल्यामुळे आजूबाजूला पोलिसांचे कडे होते. त्यामुळे मला ऐकू येईल इतक्याच आवाजात `जे सांगायचे होते ते’ माझ्यापर्यंत पोहोचले. उरलेली दोन-चार वाक्ये लिफ्टमधून सेशन कोर्टाच्या तिसऱ्या मजल्यावर जाताना कानावर पडली आणि पुढच्या तारखेला भेटण्याचे ठरले.
न्यायालयात जाण्याचा निर्णय किती योग्य होता हे त्यावेळीच मला पटले. साहेबांशी बोलणे झाले, त्यांना जवळून पाहता आले याचे खूप समाधान वाटले, पण त्यापेक्षाही तुरुंगात राहून त्यांनी जे काम हाती घेतले होते त्याला माझा हातभार लागणार आहे याचे समाधान आणखीन मोठे होते. म्हणूनच मी पुढच्या तारखेची वाट बघत होतो.
साधारण दोनेक आठवडय़ांनी ती तारीख आली. मी त्या दिवशी कोर्टाच्या तळमजल्यावर उभा होतो. त्यांच्याकडून जे मला ताब्यात घ्यायचे होते ते अर्थातच काहीतरी सनसनाटी असणार याची खात्री होती. साहेब काही कागदी सामग्री देणार होते. ती सुरक्षितपणे बाहेर घेऊन जाण्यासाठी मी बॅग घेऊनच कोर्टात आलो होतो. थोडय़ा वेळाने साहेब पोलिसांच्या गाडीतून आले, पण ज्याच्यासाठी मला बोलावले होते ते काही त्यांच्या हातात दिसत नव्हते.
“सिक्युरिटीमुळे आणि थोडं मोठं बाड असल्यामुळे मला बाहेर आणता आलं नाही. बघू पुन्हा…” असे सांगून ते कोर्टरूमच्या दिशेने निघून गेले. पुढच्या दोन-तीन तारखांनाही असेच झाले. जेल मॅन्युअलच्या नियमांनुसार ठरावीक ग्रॅम वजनापेक्षा जास्त कागदपत्रे त्यांना बाहेर आणता येत नव्हती. शेवटपर्यंत ती आलीही नाहीत.
अखेर जेलमधून सुटका झाली आणि दुसऱ्याच दिवशी `सामना’त आल्यावर साहेबांनी मला एक जाडजूड वही आणि भरपूर पेपर्स दिले. सेशन कोर्टात प्रत्येक तारखेला उत्सुकतेने आणि आशेने जी सनसनाटी सामग्री मिळेल या आशेने मी जात होतो, ती वही माझ्या हातात येताच हरखून गेलो. ती वही आणि पेपर्स म्हणजे 17 मे रोजी प्रकाशित होणाऱ्या `नरकातला स्वर्ग’चे हस्तलिखित होते. ते ताब्यात मिळताच मी त्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. टाईप होईल तशी उत्सुकता वाढत होती. त्यांचे शब्द अंगारासारखे आदळत होते. ईडी, सेशन कोर्ट, आर्थर रोड जेलविषयी लिहिलेली प्रकरणे वाचत काम करताना चार दिवसांत शेवटच्या पानापर्यंत कधी आलो हे कळलेही नाही.
पुस्तकाचा अर्धा भाग जेलमध्ये सलग लिहिला होता, पण बाहेर आल्यानंतर `सामना’, शिवसेना, राजकीय घडामोडी यामुळे टप्प्याटप्प्याने दोन-तीन, दोन-तीन प्रकरणे मिळत होती. त्यामुळे पुस्तकाच्या कामात खंड पडत होता. म्हणून दोन वर्षे मी एक युक्ती आखली. साहेबांची व्यस्तता माहीत असल्यामुळे प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कामात व्यत्यय न आणता साहेब ऑफिसमधून निघायची हालचाल होताच मी आमच्या `सामना’च्या लॉबीमध्ये उगाच इकडून-तिकडे फेऱ्या मारत असे किंवा त्यांच्या नजरेस पडेन अशा ठिकाणी उभा राहत असे. जेणेकरून मला पाहिल्यावर त्यांना पुस्तकाच्या कामाची आठवण व्हावी. माझी ही युक्ती तशी बरीच कामी आली. मला पाहिले की, साहेबांना पुस्तकाची आठवण यायची आणि मग पुढच्या दोनेक दिवसांत हस्तलिखिताची आठ-दहा तरी पानं माझ्या हाती पडायची. दरम्यानच्या काळात पुस्तकासंबंधी वारंवार होणाऱ्या भेटींत पाने, फोटो, कव्हर यासंबंधी चर्चा होत असे. अशा प्रकारे आता पुस्तक पूर्णत्वाकडे चालले होते.
एव्हाना न्यूज चॅनेल आणि वर्तमानपत्रांमधून राऊत साहेब जेलवर पुस्तक लिहीत आहेत याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. सर्वांनाच या पुस्तकाची उत्सुकता होती. साहेब योग्य प्रकाशकाच्या शोधात होते. अखेर त्या योग्य प्रकाशकाचे नाव ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी सुचवले आणि पहिल्याच भेटीत पुण्याच्या `न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस’चे शरद तांदळे यांच्याकडे प्रकाशनाची धुरा सोपवली. जवळ जवळ 90 टक्के झालेले काम पुढच्या सोपस्कारासाठी मी `न्यू ईरा’च्या टीमकडे सोपवले. आता थोडेसेच, पण महत्त्वाचे काम उरले होते… फिनिशिंग.
`न्यू ईरा’चे कार्यालय पुण्यात. साहेब कधी मुंबई, कधी दिल्ली, तर कधी महाराष्ट्रात इतरत्र दौरे. त्यामुळे शेवटचे सहा महिने न्यू ईरा आणि `नरकातला स्वर्ग’ यांच्यामधला दुवा म्हणून मी काम केले. `न्यू ईरा’चे सर्वेसर्वा शरद तांदळे, पुस्तकावर संपादकीय संस्कार करणाऱ्या प्रज्ञा भोसले, डिझायनर रत्नेश चोरगे यांच्याशी सहा-आठ महिने माझा संपर्क होता. त्यांना काही अडले, खटकले किंवा नव्याने मुद्दे सुचले की, मी ते साहेबांपर्यंत पोहोचवत असे आणि तशा सुधारणा होत होत्या. अशा प्रकारे नोव्हेंबर 2022 ला `नरकातला स्वर्ग’चं सुरू झालेलं काम एप्रिल 2025 मध्ये प्रिंटिंग मशीनचं बटन चालू होईपर्यंत सुरूच होतं. आता दोन-तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर `नरकातला स्वर्ग’ महाराष्ट्र आणि देशातील वाचकांच्या भेटीला येत आहे.
या पुस्तकाचं खरं श्रेय भाजप आणि ईडीला द्यावं लागेल. कारण त्यांनी साहेबांना अटक केली नसती तर हे पुस्तक लिहिलं गेलं नसतं. `नरकातला स्वर्ग’ हे केवळ पुस्तक नसून तो एका सुडाच्या राजकारणाचा दस्तावेज आहे. हे सुडाचे राजकारण फक्त आर्थर रोड जेलपुरतेच मर्यादित नाही. देशभरातील कारागृहामंध्ये विरोधी पक्षांचे अनेक नेते अडकले आहेत, किंबहुना अडकवले गेले आहेत. हे सूडनाटय़ देशभरातील लोकांना कळण्यासाठी `नरकातला स्वर्ग’ केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी, इंग्रजी आणि देशातील प्रमुख भाषांमध्येही प्रकाशित होणार आहे.
राज्यातील बडे बडे नेते ईडीला घाबरून भाजपच्या वळचणीला गेले तसे राऊत साहेब यांनीही आपल्या तत्त्वांशी तडजोड केली असती तर त्यांना अटक टाळता आली असती, परंतु निष्ठा काय असते हे त्यांनी कृतीतून दाखवलं होतं. आपली लढाई ही सत्यासाठी आहे आणि त्यासाठी कोणताही त्याग करावा लागला, संघर्ष करावा लागला तरी त्याला सामोरे जाण्याची त्यांनी तयारी केली होती. त्यामुळे राऊत साहेब यांना अटक झाली. भाजप सोडून कुणालाही ही अटक मान्य नव्हती. मी तर साहेबांच्या सावलीत गेली 35 वर्षे वावरत असल्याने त्यांना झालेली अटक खूप सलत होती. म्हणूनच साहेबांना न्यायालयात आणणार आहेत असं कळल्यानंतर किमान त्यांना लांबून तरी पाहावं, तत्त्वासाठी धैर्याने अटक स्वीकारलेले राऊत साहेब कसे दिसत असतील, या संकटाचा सामना ते कसे करत असतील, या उत्सुकतेपोटीच त्या दिवशी कोर्टात जाण्याचा मोह झाला आणि मला `नरकातला स्वर्ग’चा हिस्सा बनता आलं.
राऊत साहेबांच्या मते, त्यांचे अक्षर नागमोडी वळणाचे आहे आणि `सामना’त थोडक्याच लोकांना ते कळते. त्यातला मी एक. या पुस्तकाचे काम करणे खरं तर माझ्यासाठी भूषणावह होतं. कारण ज्या पुस्तकावर आता चॅनेलवर चर्चासत्रे होणार आहेत, वृत्तपत्रांचे रकाने भरणार आहेत, देशभर आणि परदेशातही चर्चिले जाणार आहे, त्या पुस्तकाचा पहिला वाचक होता आलं यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो.
पुस्तकाचा पहिला वाचक म्हणून शेवटी इतकेच सांगेन की, असे पुस्तक शतकातून एकदाच निर्माण होते. त्यासाठी लेखकाला खडतर, कठीण प्रसंगातून जावे लागते. वाचक प्रदीर्घ काळ वाट पाहत आहेत असे हे पुस्तक अखेर येत आहे!
harugadebhagwan@gmail.com