विज्ञान रंजन – तृणपात्यांची आरास!

>> विनायक

पाऊस  जोर धरतोय. धरती चिंब भिजतेय. रानावनात हिरवाई उमटतेय. डोंगरांवरून छोटे-मोठे धबधबे कोसळतायत. कुठे नद्या-नाल्यांना पूरही येतोय. महानगरातल्या गर्दीची पावसाने त्रेधातिरपिट उडतेय… दरवर्षीची ही दृश्ये. आपल्या देशात जून ते सप्टेंबर हा साधारण पावसाळा ‘नेमेचि’ येण्याचा ऋतू. त्याचं रूप कुठे मनोहारी, तर कुठे रौद्रभीषण, तर कुठे रौद्ररम्य. पहिल्या पावसात चिंब भिजण्याचा आनंद परवा सत्तरी उलटल्यानंतरही अनुभवला. रोजच्या जीवनाच्या धकाधकीत थोडासा वेळ काढून उगवता-मावळता सूर्य पाहणं, चंद्राच्या टिपूर चांदण्यात न्हाणं, शहरापासून दूर आडवाटेला डोंगरात भटकणं आणि पाऊस अंगावर घेत चिंब होणं यातली मौज निदान शहरी लोक तरी गमावत चाललेत की काय असं वाटतं.

परवा आमचे काही मित्र ‘सुट्टीच्या दिवशी’ पावसात भिजायला (कार वगैरे घेऊन) निघाले… आणि त्या दिवशी लख्ख ऊन पडलं! निसर्ग माणसाच्या सवयीनुसार नव्हे तर त्याच्याच लहरीनुसार निर्हेतुक ‘वागत’ असतो. आपल्या ‘टर्म्स’वर तो ‘व्यक्त’ होत नाही हे चांगलंच. धो धो पाऊस पडेल त्याक्षणी चिंब व्हायला जाणं ‘परवडणं’ ही खरी ‘श्रीमंती’ मला ती किमान साठ-पासष्ठ वर्षे अनुभवता आलीय.

मूळ मुद्दय़ावर यायचं तर पावसात एरवी उघडे बोडके असणारे डोंगरही हिरव्या मखमलीची शाल ओढतात. मग सपाट मैदानातल्या हिरवळीला तर ठायीठायी आसुसून बहरायला वाव मिळते. अगदी रेल्वे ट्रकमधल्या खडीमधून उसकटून टाकलेलं गवतसुद्धा पावसाच्या पहिल्याच सरीने कुठून कसं पण हळूच डोकावतं. या ‘पहिल्या हिरव्या तृणपात्याचा सत्कार’ करायला मन मात्र उल्हसित आणि उत्सुक हवं.

आज सातव्या मजल्यावरच्या खिडकीतून समोरच्या मैदानात गच्च फुललेली हिरवळ दिसतेय. नजर सुखावतेय. संस्कृतमध्ये गवताला ‘तृण’ आणि ‘मऊ’पणाला ‘मृदू’ असे जरा कठीण उच्चाराचे शब्द आहेत. मराठीतलं ‘गवत’, ‘गव’ म्हणजे गाय आणि ‘अत्त’ म्हणजे तिचं अन्न यातून तयार झालाय असं मानलं जातं. इंग्लिशमधला ‘ग्रास’चं हिंदीत ‘घास’ कसं झालं (की आधीच होतं?) ठाऊक नाही, पण संस्कृतातील ‘ग्रास’सुद्धा मराठीत अन्नाचा ‘घास’च असतो. अशी ही ‘गवत’, ‘ग्रास’, ‘घास’ची गंमत.

गवताचा काळ. ‘पोएसे’ प्रकारच्या गवत प्रकारांचं वय फारच मोठं. तशी ही वनस्पती करोडो वर्षांपासूनची. नुसत्या गवताचे किती उपप्रकार आहेत माहितेय? सुमारे 12 हजार! ‘महापुरे झाडे जाती तेथ लव्हाळे वाचती’ या तुकोबांच्या अभंगात म्हटल्याप्रमाणे चहुबाजूला नेहमी दिसणारं गवत आपल्या पायतळी येणारं. फार तर पाऊल ‘बुडवणारं’, पण अनेक गवत प्रजाती प्रचंड उंचीच्या असतात. आपल्याकडे आसाममध्ये आणि आफ्रिकेत उंचच उंच वाढणारं नेपिअस किंवा ‘पेनिसेटम पर्प्युरियम’ गवत चक्क हत्ती लपेल एवढं उंच वाढतं!

मुंबईतही साधारण गुरं-ढोरं सामावतील अशी मोठी गवताची कुरणं आमच्या लहानपणी कुर्ला-विद्याविहारच्यामध्ये होती. आता ठिकठिकाणी ‘कृत्रिम गवत’ पसरतात किंवा मुद्दाम हिरवळीचं गवत रुजवावं लागतं. दुर्वांपासून उंच वाढीच्या बांबूपर्यंत आणि अगदी भाताच्या रोपांपासून कठीण उसापर्यंत साऱ्या खाद्य वनस्पतीसुद्धा वनस्पती शास्त्रात ‘गवत’ म्हणूनच ओळखल्या जातात. गवताचे खाद्यप्रकार अनेक. चिनी, जपानी लोक वर्षानुवर्षे पौष्टिक गवत खातात. गुरं-ढोरं ज्यावर पुष्ट होतात ते गवत पौष्टिक असणारच. त्यांच्या त्या ‘अन्ना’तूनच अनेक जीवनसत्त्वं असलेलं दूध आपल्याला मिळतं. हा ‘कडबा’ म्हणजे पाळीव पशूंचं मुख्य अन्न असतं.

बरेचसे महाकाय प्राणी ‘गवतखाऊ’च असतात. एकेकाळी काही प्रजातींचे प्रचंड डायनॉसॉर गवतावर जगत असत. आजही हत्ती गवतावरच गुजराण करतो आणि बेढब गेंडय़ाचं अन्नही तेच असतं.

‘गवत’ या संज्ञेत मोडणारी कितीतरी तृणधान्य (मिलेटस्) आपण खात असतो. सध्या तर जगभर त्यांच्या पौष्टिक तत्त्वांचा (न्यूट्रिशनल व्हॅल्यूचा) फारच गाजावाजा चाललेला दिसतो. असे हे अनेक गुणसंपन्न गवत निसर्गाची शोभा वाढवतं, पण काही ठिकाणी डास, मच्छरांचं आगरही ठरतं. पूर्वी त्यावर ‘डीडीटी’चा फवारा मारला जायचा. आता डासांचे ‘लार्व्हा’ (नवजात डास) त्याला दाद देत नाहीत, असे त्यांच्याच जनुकीय बदल (म्युटेशन) झालंय.

एरवी गवत खरंच नेत्रसुखद असतं. उन्हाळ्यात ज्या मैदानातून पार करपून गेल्यासारखं वाटतं ते त्या गवताकडून अमर जीवनेच्छा शिकावी. यशवंत कवी म्हणतात त्यानुसार त्यांची ‘मुळी’ पाताळापर्यंत रुजलेली असावी. म्हणून पावसाच्या पहिल्या शिडकाव्यानंतर जिथे जागा मिळेल तिथे हरळी फुलते. आयुष्यातली सुखदुःख क्षणभर विसरायला लावते.