अजित दादांच्या अकाली निधनामुळे कधीही भरुन न येणारी पोकळी…, रितेश देशमुखने व्यक्त केल्या भावना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुकीच्या सभांसाठी बारामतीत येत असताना लँडिंग दरम्यान ही दुर्घटना घडली. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने भावना व्यक्त केल्या आहेत.

रितेशने एक्स अकाऊंटवर विलासराव देशमुख आणि अजित पवार यांचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, एका दुर्दैवी अपघातात आपण अजित दादांना गमावले आहे. ही बातमी ऐकून मला खूप मोठा धक्का बसला, मन सुन्न झाले आहे. महाराष्ट्राच्या सर्वात गतिमान नेत्यांपैकी एक असलेले अजित दादा कामात हलगर्जीपणा अजिबात सहन करत नव्हते आणि ते आपल्या सभोवतालच्या लोकांना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सतत प्रेरित करत असत. ते स्पष्टवक्ते होते, त्यांची विनोदबुद्धी अतुलनीय होती आणि संपूर्ण राज्यात ते सर्वांचे लाडके होते. त्यांच्या अकाली निधनामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून येणार नाही. मला त्यांच्याशी अनेकदा संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांना नेहमीच स्मरणात ठेवेन. पवार कुटुंब, त्यांचे प्रियजन आणि लाखो समर्थकांप्रति मी माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो, असे रितेश देशमुखने पोस्टमध्ये म्हटले आहे.